‘‘कुष्ठरोग निवारणासाठी शासनाकडून गेली दोन दशके प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तरीही अजून भारतात कुष्ठरोगाचे निर्मूलन झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. कुष्ठरोग निर्मूलनामध्ये सामाजिक
मानसिकता बदलणे हे मोठे आव्हान आहे,’’ असे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी बुधवारी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था-आरोग्य संधानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या महिलांच्या सत्कार समारंभामध्ये अन्सारी बोलत होते. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, महापौर वैशाली बनकर, आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था- आरोग्य संधानचे अध्यक्ष राम नाईक, उपाध्यक्ष राम बेलवडी उपस्थित होते. यावेळी कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या कोल्हापूर येथील माया रणावरे, दापोडी येथील वत्सला संगीत, बिहार येथील सीता देवी, कर्नाटकमधील भीमवाई मराठे, बासम्मा देवनूर, तामीळनाडू येथील नेविस मारी, ओडिसा येथील सरिता मारथा, मध्य प्रदेश येथील हीरा भंडारी, पार्वतीबाई प्रेमसिंह, कमलाबाई चाँदरास यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अन्सारी म्हणाले, ‘‘भारतात अजूनही सव्वा लाखापेक्षा अधिक कुष्ठरोगी आहेत. कुष्ठरोग निवारणासाठी शासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येतच आहेत. मात्र, ही फक्त शासनाची जबाबदारी नसून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. अजूनही कुष्ठरोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स तयार होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या आजाराबाबत मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे.’’
शंकरनारायणन म्हणाले, ‘‘कुष्ठरोगाबाबत समाजात खूप गैरसमज आहेत. रुग्णांवर उपचार करतानाच त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे आणि समाजाने या रुग्णांना सन्मानाने स्वीकारावे यासाठी जागृती होणे गरजेचे आहे.’’ कुष्ठरोग निर्मूलन झाल्याची शासनाची भावना ही अवास्तव असून शासनाने या रुग्णांसाठी आखलेल्या योजनाही अव्यवहार्य असल्याचे मत न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
कुष्ठरोग्यांच्या समस्यांवर कार्यवाही नाही
कुष्ठरोग्यांच्या समस्यांबाबत आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था-आरोग्य संधानने राज्यसभेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कार्यवाही करण्याबाबतचा अहवालही राज्यसभेमध्ये मांडण्यात आला. मात्र, पाच वर्षे शासनाकडून काहीही कार्यवाही न झाल्याचा आरोप राम नाईक यांनी यावेळी केला. या समितीच्या अहवालावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची सूचना शासनाला देण्याचे आश्वासन अन्सारी यांनी या वेळी दिले.