सांगली जिल्ह्यात नुकसान जास्त; हेल्पलाइन सुरू करणार

अतिवृष्टीमुळे पुणे विभागात सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. विभागात सांगली जिल्ह्यात जास्त नुकसान झाले आहे. सर्व जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याची सूचना दिली असून प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी  स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात येईल अशी माहितीही म्हैसेकर यांनी पंढरपूर येथे दिली.

राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी सोलापूर आणि शनिवारी पंढरपूर येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्या ठिकाणी मी भेट दिली तेथील शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे मिळत नाहीत अशी तक्रार केली. त्याची गांभीर्याने दाखल घेत विम्याचे पिसे देण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जर पाऊस झाला आणि पिकाचे नुकसान झाले तर अशा ठिकाणचे पंचनामे करण्याचे सूचना दिल्या आहेत. सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार जवळपास दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात वाढ  होऊ  शकते. सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. पंचनामे येत्या तीन ते चार दिवसांत केले जातील. पंचनाम्याबाबत प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाइन सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे म्हैसेकर यांनी सांगितले. दरम्यान पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील श्रीनाथ पांडुरंग नामदे यांच्या द्राक्ष बागेची पाहणी म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सचिन ढोले, जि.प.सदस्य वसंत देशमुख, रामदास ढोणे आदी उपस्थित होते.