आज पश्चिम घाट परिसरात जे काही चालले आहे ते म्हणजे वरून लादलेला विकास आणि वरून लादलेले निसर्ग संरक्षण. निसर्गाची, लोकांच्या आरोग्याची व त्यांच्या उपजीविकेच्या साधनांची नासाडी ही याची निष्पत्ती आहे, असे मत जेष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
वनराईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. माधव गाडगीळ लिखित ‘सह्याद्रीची आर्त हाक: पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोपटराव पवार, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत देशमुख यांनी केले.
यावेळी बोलताना पोपटराव पवार म्हणाले, की भविष्यात विकासाच्या नावाखाली निसर्गाला आपण अशाच पद्धतीने ओरबाडत राहिलो तर उत्तराखंड आणि केरळनंतर निश्चितपणे महाराष्ट्राचा नंबर लागेल. गाडगीळ अहवाल आणि कस्तुरंगन अहवाल ही दोन वेगवेगळी टोके आहेत. भविष्यातील नैसर्गिक आव्हानांचा विचार करता शासनाने गाडगीळ अहवालाचा पुर्नविचार करणे गरजेचे आहे.