पुणे : ‘दगड उभा केला, तरी तो निवडून आणू, असे काँग्रेसला वाटत होते. ते आम्हाला जवळ करत नव्हते. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठीच भारतीय जनता पक्षात गेलो,’ असे स्पष्टीकरण राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे रविवारी दिले.

रासपच्या वतीने महादेव जानकर यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेत ते बोलत होते. प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू, अमर कदम, प्रकाश बालवडकर, काशिनाथ शेवते, कुमार सुशील, अजित पाटील, सुधाकर जाधवर, शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.

‘राजकारण आणि चळवळ यात खूप फरक आहे. चळवळ नेहमी शेतकरी आणि उपेक्षितांच्या बाजूने उभी राहते. मात्र, राजकारणात उजव्या बाजूला का उभे राहावे लागले, याचे कारण म्हणजे काँग्रेस आम्हाला महत्त्व देत नव्हती. त्यांना नेहमी वाटायचे, की यांची काय गरज आहे? त्यांच्या समाजातील एखाद्याला मंत्री केले, की त्यांचे काम संपले, असे काँग्रेसला वाटत होते. मात्र, आत्मविश्वास गमाविलेल्या समाजाला पुढे आणण्याचे काम मी, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्रित केले. काँग्रेसचे मतदार फिरवून त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपमध्ये गेलो,’ असे जानकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘भाजपबरोबर कोणतेही भांडण नाही. भाजप आजही युतीत येण्याचे निमंत्रण देत आहे. मी धाकटा भाऊ असल्याचे पंतप्रधान सांगतात. भाजप आजही आमदार, खासदार करायला तयार आहे. मात्र, मी त्यांच्यासोबत गेलो नाही. कोणाच्या मागे जाऊन आमदार, खासदार व्हायचे नाही.’

‘चमच्यांची फौज जमा करण्याचे काम भाजप आणि काँग्रेसने केले. मी चमचा म्हणून कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही. सामाजिक आणि जातीय संघटना चालवणे सोपे असते, पण पक्ष चालवणे कठीण आहे. जात म्हटले, की लोक लगेच एकत्र येतात. सर्व जातींना सोबत घेऊन जाणारा पक्षच पुढे जातो. रासपने चार राज्यांमध्ये चांगले यश मिळवले आहे,’ असे जानकर यांनी सांगितले.