पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय-राज्य सुट्या, सत्र सुटी, अन्य सुट्या विचारात घेतल्यानंतर २३४ दिवस कामकाज अपेक्षित आहे. त्यामुळे शाळांचा एकूण कामकाजाचा वेळ वाढणार असून, हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत राज्य अभ्यासक्रम आराखड्यात देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा कधी, अर्ज भरण्यासाठीची मुदत किती?

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. त्यात राज्य मंडळाच्या शाळांसाठीही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) वार्षिक वेळापत्रक लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सीबीएसईशी संलग्न शाळांचे नवीन वर्ष १ एप्रिल रोजी सुरू होऊन ३१ मार्च रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करून संपते. या शाळांना मेमध्ये उन्हाळी सुटी आणि सत्र संपल्यावर किंवा राष्ट्रीय सण-समारंभाच्या अनुषंगाने काही दिवसांच्या दीर्घ सुट्या दिल्या जातात. मे महिन्यातील सुटीनंतर शाळा १ जून रोजी पुन्हा अध्यापन कार्य सुरू करतात. सीबीएसई संलग्न शाळा भारतभर आणि भारताबाहेरही सुरू आहेत. याचा अर्थ उत्तर भारतातील अति थंड किंवा अति उष्ण असे विषम वातावरण असणाऱ्या क्षेत्रांमध्ये, अतिवृष्टीप्रवण क्षेत्रातील सर्व शाळांसाठी वार्षिक वेळापत्रक समान असल्याचे दिसून येते, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> विकसित भारतासाठी सहकार क्षेत्र का महत्वाचे? माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं कारण…

सद्य:स्थितीत राज्यातील पूर्ण वेळ शाळा सहा ते साडेसहा तास भरतात, तर अध्यापनासाठी चार ते साडेचार तास असतात. इमारत अपुरी असल्यामुळे किंवा विद्यार्थिसंख्या जास्त असल्यामुळे अनेक शाळा दोन सत्रांत चालवाव्या लागतात. या शाळांना उपलब्ध होणाऱ्या वेळेचा विचार करावा लागणार आहे. अशा दोन सत्रांतील शाळांना दिवसाला जास्तीत जास्त साडेपाच तास उपलब्ध असतात. त्यात अध्यापनासाठी साडेचार तास मिळतात. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार दैनंदिन पाच ते साडेसहा तास अध्यापन होणे आवश्यक केले आहे. त्यात तिसरी ते पाचवीसाठी घड्याळी एक हजार तास, सहावी ते दहावीसाठी घड्याळी १२०० तास शैक्षणिक कामकाज होण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्याची पूर्तता सर्व शाळांमध्ये होणे कठीण आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शाळांना आवश्यक कामकाज कालावधी, राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यानुसार निश्चित केलेली श्रेयांक पातळी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अध्ययन कालावधी उपलब्ध करून देणे आवश्यक असेल. दैनंदिन कामकाजासाठी वेळ कमी मिळत असल्याने शाळा जास्त दिवस सुरू ठेवून तो कालावधी वर्षभरात भरून काढता येईल. वर्षभरात अभ्यासक्रमाचा कार्यभार प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी वार्षिक वेळापत्रक लागू करणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

सीबीएसई शाळांतील गुणवत्तेचे तर्कट

‘सीबीएसईच्या शाळांमध्ये खूप दीर्घ सुट्या न देता अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, उपक्रम शाळेतच सुरू ठेवले जातात. त्यामुळे सीबीएसई संलग्न शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून येते,’ असे तर्कट राज्य अभ्यासक्रम आराखड्यात लावण्यात आले आहे.