पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक (आयटी) पार्ककडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी मुळा नदीत थेट सोडले जात असल्याचा ठपका ठेवणारी नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. आता याप्रकरणी आयटी पार्कसह हा प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीला ३५ लाख रुपयांची बँक हमी जमा करण्याचे निर्देश मंडळाने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदूषित पाण्यामुळे मुळा नदीतील माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला तपासणी केली. या तपासणीत प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ४ मेगालिटर असताना प्रत्यक्षात हा तिथे प्रतिदिन १.५ मेगालिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे आढळून आले. यामुळे मंडळाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटीस बजावली होती.

या नोटिशीनंतर मंडळाच्या कार्यालयात एमआयडीसीचे अधिकारी आणि हा प्रकल्प चालविणारी कंपनी यांच्या उपस्थितीत ३ मार्चला सुनावणी झाली. या सुनावणीनंतर आता पुन्हा मंडळाने हिंजवडी आयटी पार्कची जबाबदारी असलेले एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आणि प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीला नोटीस बजावली आहे. यात समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी ७ दिवसांत सुधारणा करण्याची मुदत दिली आहे. याचबरोबर एमआयडीसी अथवा प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीने ३५ लाख रुपयांची बँक हमी मंडळाकडे जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मंडळाचा ठपका काय?

मंडळाने आधीच्या नोटिशीत म्हटले होते, की आयटी पार्कमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे अपुरे असल्याने हा प्रकल्प कमी क्षमतेने सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील अनेक विभाग बंद आहेत. याचबरोबर साठवण टाक्या योग्य स्थितीत नसल्याने सांडपाण्याची दुर्गंधी प्रकल्पाच्या आवारात सगळीकडे पसरली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण यंत्रणा नाही. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून दररोज प्रक्रिया केलेल्या पाण्याचे केवळ ८ ते १० टँकर बाहेर पाठविले जातात. इतर सर्व अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी थेट मुळा नदीत सोडले जाते. प्रकल्पाच्या बाहेरील सांडपाणी वाहिन्या फुटलेल्या अवस्थेत आहेत.

मंडळाचे एमआयडीसीला निर्देश काय?

  • संपूर्ण आयटी पार्कमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे उभारावे.
  • समाईक सांडपाणी प्रक्रिया विनाखंड सुरू ठेवावा.
  • प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचे निर्जंतुकीकरण करणारी यंत्रणा बसवावी.
  • प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा दुय्यम कामांसाठी वापर करावा.
  • सांडपाणी वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती करावी.

‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांचे मौन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीवरून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे. एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांनी याप्रकरणी हिंजवडी आयटी पार्कची जबाबदारी असलेले कार्यकारी अभियंता संजय इंदुले यांच्याकडे बोट दाखविले. इंदुले यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.