पुणे : यंदाच्या पावसाळ्यात मंगळवारपर्यंत (१३ ऑगस्ट) राज्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के, तर देशात सरासरीच्या तुलनेत पाच टक्के जास्त पाऊस झाला आहे. सध्या देशात मोसमी पावसाने उघडीप घेतली आहे. महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते १२ ऑगस्ट, या काळात राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. या काळात राज्यात सरासरी ६६९.४ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ८५२.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हेही वाचा >>> राज्यातील पशुधन रोगमुक्त जाणून घ्या, पशुसंवर्धन विभागाने नेमकं काय केलं

एकूण देशाचा विचार करता याच काळात सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. देशभरात या काळात सरासरी ५६१.९ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५९२.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस तमिळनाडू आणि पुदुचेरीत पडला. तमिळनाडूत सरासरीपेक्षा ९२ टक्के आणि पुदुचेरी येथे ८६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस लडाख या केंद्रशासित प्रदेशासह सात राज्यांत पडला आहे. त्यात सिक्कीम, दिल्ली, राजस्थान, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा समावेश आहे.

हेही वाचा >>> सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल

सरासरीइतक्या पावसाची नोंद १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत; तर सरासरीपेक्षा कमी पाऊस आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत झाला आहे. त्यांत सिक्कीमवगळता ईशान्य भारतातील राज्यांसह बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे. मणिपूर येथे सर्वांत कमी- सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी- पाऊस पडला आहे. सध्या राज्यासह देशभरात पावसाने उघडीप दिली आहे. कमाल तापमानातही सरासरी चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. महिनाअखेरीस पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.