पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपये खर्च होणार असले आणि विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला केला, तरी राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. जीएसटीचे उत्पन्न वाढत आहे, मुद्रांकांचे उत्पन्न वाढत आहे. खनिजाचे साठे सापडत आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात सांगितले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात असेच एक घबाड सापडले आहे. त्यातून पुढील काही वर्षांत काही हजार कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळवून देईल. एका मोठ्या भारतीय, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीने त्यासाठी काम करण्याबाबत विचारणा केली आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या विषयातील उत्कृष्टता केंद्राचे (एक्सलन्स सेंटर) उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा…पिंपरी : अजित पवारांना मोठा धक्का! शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचा राजीनामा

पाटील म्हणाले, की मी मंत्री झालो तेव्हा राज्यातील विद्यार्थिसंख्या ३३ लाख होती. स्कूल कनेक्टसारखे उपक्रम राबवून, रात्रंदिवस काम करून मुले-मुले मिळून विद्यार्थिसंख्या ४३ लाख झाली. दहा लाख विद्यार्थी वाढले. ही संख्या ५० लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुलींच्या शुल्कमाफीमुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मुलींचे १०० मध्ये ३६ असलेले प्रमाण वाढवून ५०-५१पर्यंत न्यायचे आहे, असेही पाटील म्हणाले.