पिंपरी-चिंचवड: भारताचा पाया सनातन आहे आणि सनातनवर प्रहार हे महाविनाशाला आमंत्रण आहे. ‘बटेथे तब कटेथे.. अब बटेंगे नहीं… एक रहेंगे तो सेफ रहेंगे’. काँग्रेस सत्ताकाळात पाकिस्तान भारतात घुसखोरी आणि दहशतवादी हल्ले करीत होता. आम्ही संसदेत आवाज उठवत होतो. त्यावेळी पाकिस्तानशी संबंध बिघडतील म्हणून काँग्रेस यामुद्द्यावर बोलू नका, अशी भूमिका घेत होते. मात्र, आता नवा भारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात नवा भारत म्हणजे ‘‘हम छेडेंगे नहीं लेकीन हमें छेडेंगे तो छोडेंगे नहीं’’ असा संदेश जगभरात गेला आहे. हा नवा भारत आहे. घुसखोरी कराल, तर घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. देशाच्या समस्येचे कारण काँग्रेस आघाडी आहे, तर समस्यांवरील समाधान भाजपा महायुती आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर रविवारी विराट सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सभेला सुरूवात झाली.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी

योगी आदित्यनाथ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यभूमिला नमन करतो. महाराष्ट्रात नवीन सरकार बनवण्यासाठी निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात महायुती गठबंधन आहे. गेल्या १० वर्षांत नवा भारत निर्माण होत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या भावनेतून देशाची प्रगती सुरू आहे. कुणाचे तुष्टीकरण केले जात नाही. भारताला जोडणाऱ्या शक्ती ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ विचाराने महागठबंधन म्हणून एकत्र आल्या आहेत. दुसऱ्या बाजुला ‘महाअनाडी गठबंधन’ आहे. ज्यांच्याकडे निती, नियत आणि निर्णय घेण्याची क्षमता आणि सामर्थ्य नाही. ‘‘सबका साथ लेकीन परिवारका विकास’’ असा ज्यांचा नारा आहे. त्यांनी भारताच्या विकासाचा विचार केला नाही.

पुढे ते म्हणाले, काँग्रेसने सत्तेची लालसा ठेवली नसती, तर १९४७ मध्ये अखंड भारत देशाचे विभाजन झाले नसते. भारत एकसंघ राहिला असता, लाखो निर्दोष हिंदू लोकांची कत्तल झाली नसती. ‘हिंदू- मुस्लिम’ अशी समस्या निर्माण झाली नसती. हिंदू- मुस्लिम समस्या भारताच्या विभाजनामुळे सुरू झाली. अखंड भारतात अशी समस्या निर्माण जरी झाली असती, तरी आज आम्ही समस्येचा निपटारा करीत आहोत, तसाच हिंदु- मुस्लिम समस्येचा निपटारा केला असता. मात्र, काँग्रेसच्या सत्तालोलूपता आणि तुष्टिकरणाच्या भूमिकेमुळे देशाचे विभाजन झाले. स्वातंत्र्यानंतर जात-प्रांत अशा मुद्यांवर देशाचे विभाजन करण्यात आले, असा दावाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

महाराष्ट्राबाबत संपूर्ण देशाला कृतज्ञता…

महाराष्ट्राबाबत संपूर्ण देशवासीयांमध्ये कृतज्ञता भाव आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या भूमित करुन दाखवली. अटक ते कटक अखंड भारत कसा असावा, याची शिकवण पेशवा बाजीराव यांनी दिली. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ असे सांगणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकता संदेश देणारे महात्मा फुले, महिला शिक्षण भारताच्या सक्षमीकरणाचा आधार असेल असा संदेश देणाऱ्या सावित्रीबाई फुले, १८५७ चे बंड हा भारताचा प्रथम स्वातंत्र्य लढा आहे असे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, ‘एक विधान सब है समान’ असे संविधान देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखे महामानव देशाला देणारा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या राज्याप्रती देशावासीयांना कृतज्ञता वाटते, अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी

नवा भारत…भाजपा डबल इंजिन सरकार…

कोल्हापूर येथील विशाळगडावर अतिक्रमण होते आहे. त्या ठिकाणी कारवाई केली, तर दगडफेक केली जात आहे. शिवरायांच्या किल्ल्यावर अतिक्रमण होते, याचे आश्चर्य वाटते. असे का झाले कारण आपण विभागलो होतो. अयोध्या, काशी- मथुरामध्ये अवमान झाला. १९४७ मध्ये लाखो हिंदुंची कत्तल झाली, कारण आपण जाती-जातींमध्ये विभागलेलो होतो. पण, आता हा नवा भारत आहे. भाजपा महायुतीला साथ द्या. गेल्या १० वर्षांत पाकिस्तानची अशी अवस्था झाली आहे की, जगभरात त्यांना कोणी थारा देत नाही. काँग्रेस पाकिस्तान व्याप्त भाग परत मिळवू शकत नाही. भाजपा महायुती पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील भागसुद्धा भारतात समाविष्ट करुन घेईल. नवा भारत पाकिस्तानला घुसून मारण्याची ताकद ठेवतो. डबल इंजिन भाजपा सरकारने श्रीराम मंदिराच्या बाबतीत ५०० वर्षांच्या समस्येचे समाधान केले. काँग्रेस देशाची समस्या आहे, तर भाजपा समाधान आहे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

हेही वाचा : ‘मावळ पॅटर्न’चे काय होणार?

महेश लांडगे म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगमनामुळे मतदार संघामध्ये उत्साह संचारला आहे. भोसरीच्या याच ऐतिहासिक मैदानावर ‘व्हीजन- २०२०’ सभा झाली होती. केलेली विकासकामे, सोडवलेले प्रलंबित प्रश्न आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत. २०१४, २०१९ आणि आता २०२४ ची ऐतिहासिक महाविजय सभा झाली. महायुती सरकारने गायीला राज्यमाता दर्जा दिला. गोवंश संवर्धन कायदा केला. देव-देश अन्‌ धर्म यासह शेती-माती संस्कृतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानुसार बारा बलुतेदार आठरा पगड जातींना सोबत घेवून जाणारे हिंदुत्व आम्ही मानतो. ‘सबका साथ सबका विकास’ हा विचार आहे. पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटेल, असा विकास करुन दाखवणार आहोत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 bjp yogi adityanath told mahavikas aghadi problem mahayuti satisfaction kjp 91 css