बारामती : – संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रात विजेचे दर आजही सर्वाधिक आहेत अशी वस्तुस्थिती असताना महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियमक आयोगाकडे पुन्हा दरवाढ मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. संभाव्य दरवाढ औद्योगिक ग्राहकांसह सर्वांवरच अन्यायकारक असलेले दरवाढीचा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा,अशी आग्रही मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी निवेदना द्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीज दरवाढ प्रस्तावाला विरोध करून त्याबाबतचे शासनाला निवेदन देण्यासाठी महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांना ऊर्जा भवन येथे निवेदन देण्यात आले, त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते. बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख वकील, सदस्य महादेव गायकवाड, राजन नायर,  उद्योजक राजेंद्र पवार, विजय झांबरे, नितीन जामदार, कैलास बरडकर, दीपक नवले, अरुण चतुर, नारायण झगडे, अशोक वणवे, रुपेश भोंगळे, महावीर कुंभारकर, अविनाश सावंत, सुशील कुमार सिंग, मुर्तुजा कोलंबोवाला , माधव खांडेकर यांच्यासह कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर,अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश जमाले आदी यावेळी उपस्थित होते.

धनंजय जामदार पुढे म्हणाले,आताच्या प्रस्तावित दरवाढीमध्ये अनेक बाबी चिंताजनक आहेत ज्यामध्ये स्थिर आकार, वीजदर, व्हिलिंग चार्जेस, ग्रीड सपोर्ट चार्जेस, ग्रीन टॅरिफ चार्जेस,फ्युएल ऍडजस्टमेंट चार्जेस यामध्ये दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. तसेच एल टी उद्योगांना पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्हचा लाभ आता मिळणार नाही. विजेचा अधिक वापर करणाऱ्या उद्योगांची बल्क कन्समशन सवलत बंद करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह आता मिळणार नाही त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या विद्युत ग्राहकांना आता या नवीन धोरणाचा चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत.

वास्तविक पाहता महावितरणने वीज चोरी, वीज गळती, ट्रान्समिशन लॉसेस, विद्युत निर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता, खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदीचे दर, प्रशासकीय खर्च या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून कार्यक्षमता वाढवून आर्थिक शिस्त आणणे गरजेचे आहे. अशा उपायोजना केल्यास वारंवार वीज दरवाढ करावी लागणार नाही,असे आमचे ठाम मत असल्याचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी बोलताना सांगितले. संभाव्य वीजदर वाढीबाबत बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून बारामतीतील उद्योगक्षेत्राचा अभिप्राय व निवेदन शासनास सत्वर पाठवण्यात येईल असे महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी यावेळी बिडा च्या शिष्टमंडळाला सांगितले.