रामदास आठवले यांनी विधानसभेच्या आठ ते दहा जागांवर दावा केला. कॅबिनेटमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गटात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सर्व काही सुरळीत चाललं आहे. कुणीही नाराज नाही, असेही रामदास आठवले यांनी सांगितलं. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. तरी जोमाने काम करत असून नाराज नाही, असेही आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं. लोकसभेत आम्हाला अपयश आलं, कारण इंडिया आघाडीने संविधानाच्या मुद्द्यावरून मतदारांना ब्लॅकमेल केलं, असा आरोप देखील रामदास आठवले यांनी केला. ते लोणावळ्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, कॅबिनेटमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात अजिबात नाराजी नाही. महायुती आजही बळकट आहे. लोकसभेबाबत माझीही नाराजी होती. ती बाजूला ठेवून महायुतीमध्ये राहिलो आणि जोमाने कामाला लागलो. पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक मंत्रीपद देणार आहेत. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. पुढे ते म्हणाले, विधानसभेत आमचा आठ ते दहा जागांवर दावा आहे. त्या मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा – कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल पोलिसांकडून बाल न्याय मंडळाकडे सादर; काय आहे अहवालात?

हेही वाचा – पुणे : घोले रस्त्यावरील वसतिगृहाच्या लिफ्टमधून उडी मारल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

लोकसभेत अपयश आलं आहे. यात अनेक कारणं आहेत. संविधान बदलणार असे इंडिया आघाडीने मतदारांना ब्लॅकमेल केलं. त्यांनी अफवा पसरवली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आम्हाला फटका बसला आहे. आता सर्व समाज आमच्यासोबत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत १७० ते १८० जागा निवडून आणायचा आमचा निर्धार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.