साहित्य संमेलनातील मुलाखतीत शरद पवार यांचे परखड मत
बाळासाहेब जवळकर,
ग्यानबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी)
वेगळ्या विदर्भाची मागणी मराठी माणसाची नाही तर मूठभर धनदांडग्यांची आहे. तो घटक बहुतांशी अमराठी आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन निवडणुका लढवणारांचा पराभव विदर्भातील बहुसंख्य मराठी भाषकांनीच केला आहे. महाराष्ट्रापासून वेगळे होण्याची भावना विदर्भातील मराठी माणसांमध्ये नाही, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी िपपरीत साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मुं. शिंदे, माजी खासदार प्रा. जनार्दन वाघमारे व माजी आमदार उल्हास पवार यांनी पवार यांची मुलाखत घेतली. शाळेतील खोडकरपणा, आईविषयीची कृतज्ञता, महाराष्ट्र िपजून काढणारे दौरे, सत्तेत आल्यानंतर महिला आरक्षण व महिलांना संपत्तीत वाटा देण्याचा निर्णय, संरक्षण खात्यात महिलांना संधी, नामांतर, वेगळा विदर्भ, मराठवाडय़ाचा रखडलेला विकास आदी विविध मुद्दय़ांवर दिलखुलास उत्तरे देत पवारांनी आयुष्याचा पट पुन्हा नव्याने उलगडून सांगितला.
वेगळा विदर्भ आणि मराठवाडय़ातील विकासाविषयीच्या प्रश्नावर पवार म्हणाले, की वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मात्र वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन ज्यांनी-ज्यांनी निवडणुका लढवल्या, काही अपवाद वगळता, त्यांचा पराभव झाला आहे आणि हा पराभव विदर्भातील बहुसंख्य असलेल्या मराठी भाषकांनीच केला आहे. मूठभर धनाढय़ मंडळींच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे केली जाते. महाराष्ट्रापासून वेगळे होण्याची भावना विदर्भातील मराठी माणसांमध्ये नाही. काही गोष्टी राजकीय स्वार्थामुळे होत असतील, असेही ते
म्हणाले. मराठवाडय़ात विकासाची अस्वस्थता जाणवते. तो कळीचा मुद्दा आहे. नैराश्याची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा