पिंपरी : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात चुरस असून, भाजपकडून ‘राष्ट्रवादी’विरुद्ध छुपा प्रचार करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. हा गोळीबार तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार झाला होता, असा छुपा प्रचार भाजपने सुरू केल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरणाऱ्या भाजपची अडचण झाली आहे. पवार हे महायुतीत आल्याने उघडपणे टीका करता येत नसल्याने भाजपने छुप्या पद्धतीने टीकेला सुरुवात केली आहे. मावळ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके असा राजकीय संघर्ष असला तरी त्याला निमित्त पवना बंदिस्त जलवाहिनी ठरताना दिसत आहे. त्यामुळे भाजपसोबत असूनही राष्ट्रवादीसाठी गोळीबाराचा मुद्दा डोकेदुखी आणि अडचणीचा ठरत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत महापालिकेने पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे निगडी येथील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाणी आणण्याची योजना आखली. पवना जलवाहिनीच्या बाबतीत मावळवासीयांनी विरोधाची भूमिका घेतली असताना पोलीस बंदोबस्तात ९ ऑगस्ट २०११ रोजी भूसंपादन सुरू केले. त्याविरोधात भाजप-शिवसेनेसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दगडफेक झाली. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. प्रकल्पाच्या विरोधातील वातावरण चिघळल्याने राज्य शासनाने १० ऑगस्ट २०११ रोजी या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली होती. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसारच गोळीबार झाल्याचे आरोप भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी केले. पुढे यावरून राजकारण रंगले. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात नाराजी पसरली. ज्या पिंपरी-चिंचवडसाठी अजित पवार यांनी पवना बंदिस्त जलवाहिनीचा आग्रह धरला. या शहरातूनही त्यांना साथ मिळाली नाही. महापालिकेतील सत्ता गेली. पुत्राचा मावळमधून पराभव झाला. भोसरी, चिंचवड मतदारसंघ गमवावा लागला. २०१४ मध्ये पिंपरी मतदारसंघही हातचा गेला होता.

हेही वाचा : भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य

जलवाहिनी प्रकल्प २०११ पासून बंद होता. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाच्या कामाची स्थगिती ८ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य शासनाने उठविली. त्याला वर्ष झाले. परंतु, अद्यापही काम सुरू झाले नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गोळीबाराचा मुद्दा चर्चेत आला. गोळीबारावेळी भाजपमध्ये असलेले सुनील शेळके आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत. शेळके आणि मावळ भाजपमध्ये कमालीचे वितुष्ट आहे. शेळके यांचा प्रचार न करण्याचा ठरावही मावळ भाजपने केला आहे. भाजपचे पदाधिकारी मावळमधील गावागावांमध्ये जाऊन अजित पवारांनी गोळीबार करायला लावला. शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले. त्या पक्षाला मदत करू नका, असा अपप्रचार करत आहेत. भाजपमधील कार्यकर्त्यांना भडकून दिले जात आहे. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप शेळके यांनी केला. त्याला भाजपने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे भाजप सोबत असतानाही राष्ट्रवादीला पर्यायाने आमदार शेळके यांना गोळीबाराचा मुद्दा अडचणीचा झाला आहे.

हेही वाचा : चिंचवड विधानसभा: अजित पवारांचा आणखी एक खंदा समर्थक साथ सोडणार? बंडखोरी करण्याचा इशारा…म्हणाले, “झुंडशाहीला…”

शेळके यांना भाजपसह स्वपक्षाचे आव्हान?

भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ‘आजपर्यंत पक्ष सांगेल तसे ऐकले, पण आता माघार नाही’ असे फलक लावत भाजपचे मावळ निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनीही माघार घेणार नसल्याचे संकेत दिले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात त्यांचे दौरे सुरू आहेत. त्यामुळे भाजपसह राष्ट्रवादीतूनही शेळके यांच्यासमोर आव्हान उभे राहणार असल्याचे दिसते.