दिल्लीच्या जहाँगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली, तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली. या हिंसाचारत नऊ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्व वातावरण आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आणि ५ जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली.

“मला दोन घोषणा करायच्या होत्या. ते बोलले की आम्ही बोलायचं तेव्हा आम्ही बोलायचं हे काही योग्य नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी बोलेन. लोकांना भोंग्याचा धार्मिक विषय आहे असं वाटत आहे, पण हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहण्याची गरज आहे,” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

‘नवहिंदू ओवैसी’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले “अशा लवंड्यांना..”

“फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्ष हा प्रलंबित राहिलेला विषय आहे. तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असू तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमजान सुरु असल्याने काही सांगायचं नाही आहे. पण ३ तारखेपर्यंत यांना समजलं नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे,” असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.

“मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. कोणत्याही हाणामारी नको आहे. शांतता भंग करण्याची इच्छाही नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण जर लाऊडस्पीकरवर लावणार असतील तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील,” असं राज ठाकरे म्हणाले.

मनसे कार्यकर्त्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर काढले जात नसतील तर आमच्या मुलांनी केलेल्या अनधिकृत कसं मानता? अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली. सुप्रीम कोर्टाने शांतताभंग करणाऱ्या लाऊडस्पीकरला परमिट देऊ नका असं सांगितलं आहे. आपण स्वत: काही गोष्टी समजून घेणार आहोत की नाही? मुस्लीम समाजालाही या गोष्टी समजल्या पाहिजेत. देशापेक्षा यांचा धर्म मोठा होऊ शकत नाही. लोकांना या गोष्टीचा त्रास होत आहे याची कल्पना त्यांना येणं आवश्यक आहे असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

आमचे हात काय बांधले आहेत का? अशी विचारणा यावेळी राज ठाकरेंनी इशारा देणाऱ्यांना दिला. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता राज ठाकरे यांनी आपण लवंडयांबद्दल फार बोलत नाही असं सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला.

“आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका,” असा इशारा राज ठाकरेंनी दिल्लीतील हिंसाचारावर बोलताना दिला.

नऊ जण जखमी –

दिल्लीमधील हिंसाचारात एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांना बाबू जगजीवन राम मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाला गोळी लागल्याने जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

१४ जणांना अटक

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकावर गोळीबार सुरु केल्याचा आरोप आहे. ही पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray on delhi violence in press conference in pune sgy