पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी उचलत असलेल्या इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातील जलपर्णी आणि बंधाऱ्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ बंधाऱ्यातील जलपर्णी काढावी, बंधाऱ्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केली. तसेच शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मागील काही दिवसांपासून मोशी, दिघी, च-होली, चिखली, जाधववाडी या भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आयुक्त सिंह यांनी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र व निघोजे बंधाऱ्याला भेट दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागात आंद्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाणी इंद्रायणी नदीत सोडून निघोजे बंधाऱ्यातून दोन पंपाद्वारे उचलले जाते. त्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. तेथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे. मोशी, दिघी, च-होली, चिखली, जाधववाडी, राजे संभाजीनगर, शाहूनगर, कुदळवाडी अशा भागात दूषित पाणी येत असल्याच्या तक्रार महापालिकेकडे येत आहेत. निघोजे बंधाऱ्यातील पाणी उपसा करण्यासाठी असणाऱ्या पंपाना आवश्यकतेनुसार पाच ते सहा ‘एरेटर’ बसवण्यात यावेत. बंधाऱ्यातील जलपर्णी तातडीने काढावी. चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्येही एरेटरची संख्या वाढवण्यात यावी. ज्या भागात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे, तेथील पाणी नमुन्यांची संख्या वाढवून त्याची तपासणी करा, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी अधिका-यांना दिल्या.
चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र व निघोजे बंधाऱ्याला भेट दिल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेल्या सूचनांनुसार तातडीने पाणी पुरवठा विभागाकडून काम सुरू करण्यात आले आहे. अशुद्ध पाण्याबाबत नागरिकांच्या ज्या भागातून तक्रारी जास्त आहेत, त्या भागातील समस्या सुटावी, यासाठी तेथे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.
एमआयडीसीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत व यांत्रिकी उपविभाग मार्फत करण्यात येणाऱ्या दुरुस्ती कामकाजाकरिता गुरुवारी (२४ एप्रिल ) शहरातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी, शनिवारी पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होणार आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर ॲण्ड डी, दिघी या भागांतील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक तो साठा आधीच करून ठेवावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.