हॉटेल व्यवस्थपक तरुणाच्या डोक्यात वार करुन खून केल्याची घटना मध्यरात्री धायरी भागात घडली. खुनामागचे कारण समजू शकले नाही.
भरत भगवान कदम (वय २४, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- नगर रस्ता परिसरात १४ लाखांचा गुटखा जप्त; गुटखा वाहतूक करणारा टेम्पो चालक अटकेत

याबाबत पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम हे गारवा बिर्याणी येथे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावर निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या मोकळ्या जागेत हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले. त्यांच्या डोक्यात वार केले. ते जखमी अवस्थेत पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. याची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तेथेच त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी मिळून आली. तसेच त्यांच्या खिशातील पैसे आणि अन्य साहित्यही तसेच होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कदम यांच्या खुनामागील नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

Story img Loader