लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य सरकारची जबाबदारी असलेल्या पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या दोन रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नाहीत. हे काम महाराष्ट्र सरकारचे असताना मला शिव्या खाव्या लागत आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत खड्डे न बुजविल्यास हे रस्ते राज्य सरकारकडून काढून घेण्याचा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. याबाबत केंद्र सरकार राज्याला नोटीस पाठविणार असल्याचे सांगत गडकरी यांनी राज्य सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.

संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण, तसेच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कर्वेनगर येथील कमिन्स महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य महाव्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-‘भूवैज्ञानिक सर्वेक्षण’कडून खड्ड्याची पाहणी, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही

गडकरी म्हणाले, की पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या दोन रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नाहीत. हे रस्ते राज्य सरकारचे आहेत. मात्र, मला शिव्या खाव्या लागतात. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

‘जाती-पातीला स्थान देत नाही’

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. मी कधीही जात-पात पाळत नाही. मी जात-पात पाळणार नाही, मी जातीपातीचे राजकारण करणार नाही. ‘जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ’, मला मत द्या, देऊ नका; मी सगळ्यांची कामे करणार आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी सांगितले.

आणखी वाचा-पुणे : दोन आरोपींकडून पाळत ठेवून वनराज आंदेकर यांचा खून

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव

लोहगाव विमानतळाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले. या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्राच्या पातळीवर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नितीन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली.

खासदार सुळेंचे भाषण आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा

खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू होत असतानाच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘भाजप झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील खासदार सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या. या वेळी सुळे यांनी हा कार्यक्रम शासकीय आहे. आम्हालाही उत्तर देता येते, असे म्हणत घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत केले. केंद्रीय मंत्री गडकरी हे पक्ष नाही, तर काम पाहतात. शिरूर आणि बारामती हे मतदारसंघ शून्य अपघाताचे व्हावेत, त्यासाठी गडकरी यांनी मार्गदर्शन करावे, असे खासदार सुळे म्हणाल्या.

आणखी वाचा-‘खड्ड्यांत’ गेलेल्या पुण्यात खड्डा बुजविण्यावरून ‘खड्डाखड्डी’!

पुण्यात दीड लाख कोटींची कामे

पुण्यात डिसेंबर महिन्यापर्यंत दीड लाख कोटी रुपयांची कामे सुरू केली जाणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. गडकरी म्हणाले, की पालखी मार्गाची निर्मिती करताना वृक्षतोड टाळून ८०० झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. हा पालखी मार्ग ‘ग्रीन हायवे’ करण्यासाठी शासनाने स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन पालखी मार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे. पुढील काळात नाशिक फाटा-खेड, पुणे-सातारा, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे-संभाजीनगर या रस्त्यांसह मुंबई-बंगळुरू नव्या द्रुतगती मार्गाचे कामदेखील सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात पेट्रोल-डिझेलऐवजी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील. यामुळे प्रदूषण कमी होऊन कमी खर्चात नागरिकांना प्रवास करणे शक्य होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.