पुणे :  नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर केंद्र सरकारची कार्यपद्धती बदलली. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी वृत्तपत्रांत सतत सरकारच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या असायच्या. मात्र, दहा वर्षांत मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. आम्ही आमची प्रतिमा स्वच्छ ठेवली आहे, असे विधान केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पुण्यात केले.

हेही वाचा >>> खेळापासून शिक्षणापर्यंत सर्वत्र राजकारणच… केंद्रीय मंत्र्याचे पुण्यात वक्तव्य…

केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे ‘विकसित भारत’ अभियानाअंतर्गत मॉडर्न महाविद्यालयात झालेल्या ‘युवा कनेक्ट’ कार्यक्रमात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिरिजू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्रा. निवेदिता एकबोटे या वेळी उपस्थित होते. रिरिजू म्हणाले, की पूर्वी निवडणुकीचे काम नसलेले अधिकारी काम नसल्याने मौजमजा करायचे. मात्र नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांना शंभर दिवसांसाठीची ‘ब्ल्यू प्रिंट’ करायचे आदेश दिले. सरकार आल्यावर ते काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, शंभर दिवसांसाठी निश्चित केलेले काम त्यापूर्वीच पूर्ण केले. पूर्वीचे मंत्री सीमावर्ती भागात जातही नव्हते. केवळ दिल्लीत बसून असायचे. मात्र आम्ही गावोगावी जातो, जमिनीवर राहू काम करतो, असे रिजिजू यांनी सांगितले.