पुणे : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे १७ ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे, तर १९ ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात सामान्य स्थिती आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थितीचा अभाव आहे. १७ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस या काळात उघडीप देईल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
हेही वाचा – आज मध्यरात्री आकाशात उल्का वर्षाचा प्रकाश उत्सव, खगोलप्रेमींसाठी पर्वणी
अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढून १८ किंवा १९ ऑगस्टपासून किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. साधारण २५ ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.