कंजार भाट समाजातील वधूच्या आईला विवाह समारंभात पोलिस संरक्षण मागण्याची वेळ आली आहे. त्यासंबंधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे त्यांनी अर्ज केला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कंजारभाट समाजातील संबंधित विवाहात काही समाजकंटक तरुण तरुणी गोंधळ घालून अडथळा आणण्याची शक्यता आहे असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पिंपरी-चिंचवड मधील एका तरुणीचा विवाह समारंभ होणार आहे. परंतु कंजार भाट समाजातील समाजकंटक तरुण-तरुणी हे या विवाह समारंभात गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वधूच्या आईने विवाह समारंभात पोलीस संरक्षण मिळावे यासाठी अर्ज दिला आहे.
यात सदरचा विवाह हा कंजार भाट समाजाच्या रूढी परंपरने संपन्न होणार असल्याचे म्हटले असून काही समाजातील तरुण-तरुणी आणि त्यांचे सहकारी हे जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी नोंदवून विवाह समारंभात गोंधळ करण्याची शक्यता असल्याचे अर्जात म्हटले आहे. यामुळे सदर विवाह समारंभात पोलीस संरक्षण देऊन विवाह सोहळा शांततेत पार पाडून पोलिसांनी सहकार्य करावे असे वधूच्या आईने संबंधित अर्जात लिहिले आहे.
दरम्यान जानेवारी २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडलेल्या विवाह समारंभात काही तरुणांनी कंजार भाट समाजातील रूढी परंपरेला विरोध दर्शवणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे प्रकरण पिंपरी पोलीस ठाण्यात पोहचले होते. घटनेनंतर सर्व तरुण-तरुणी एकवटले आणि समाजातील रूढी परंपरेला छेद देत लढा उभा केला होता यासाठी त्यांनी “Stop The vritual” या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून जनजागृती करत आहेत.