लोकसत्ता वार्ताहर
बारामती : गेल्याच आठवड्यामध्ये बारामती रेल्वे लोहमार्गावर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाच काल शनिवारी (ता. १५ ) रोजी बारामती रेल्वे लोहमार्गावर एका ५६ वर्षाचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
काल शनिवार (तारीख १५ फेब्रुवारी ) रोजी रात्री दहाच्या दरम्यान बारामती ते दौंड रेल्वे निघालेला असताना तांदुळवाडी नजीक जिजामाता नगर येथे राहणारा दत्तात्रय हरिदास शेरकर (वय ५६ ) यांचा रेल्वे लोहमार्गावर जागीच मृत्यू झाला, ही दुर्घटना शेळके लोकवस्ती जवळ घडलेली आहे.
यासंबंधी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय शेरकर हे अनेक दिवसांपासून आजारी होते, आपल्या आजारपणाला कंटाळून त्या व्यक्तीने आत्महत्या केली असावी ? असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यांच्या निकटवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार शेरकर यांच्या खुब्याची शस्त्रक्रिया झालेली होती, या शस्त्रक्रियेनंतर आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच एका तीस ते पस्तीस वर्षाच्या महिलेचा बारामती रेल्वे लोहमार्गावर अपघाती निधन झाल्याची घटना घडलेली होती, आता त्या घटने पाठोपाठ ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे,
बारामती रेल्वे स्टेशन नजीक रेल्वेच्या लोहमार्गावर यापूर्वी सुद्धा असे अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडलेले असून या अपघातामध्ये महिला, तरुण, वृद्ध व्यक्तीची मृत्युमुखी पडल्याची घटना ही घडलेल्या आहेत , या अपघाता बाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, बारामती लोहमार्गावर रेल्वे स्टेशन नजीक अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर उपायोजना केल्या जाण्याची गरज बारामती नागरिका कडून व्यक्त केली जात आहे.बारामती रेल्वे लोहमार्गावर होणारे अश्या घटना “अपघात आहे की आत्महत्या ” याबाबत पोलिसांच्या कडून चौकशी केली जात असली तरी अशा घटना वारंवार घडणे हे निश्चित चिंताजनक असल्याची बाब बारामतीतील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.