आपल्या समाजात आजही चित्रकला काहीशी दुर्लक्षितच राहिली आहे, अशी खंत प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केली. नृत्य, संगीत, साहित्य या कलांनाच शासन पातळीवर मान्यता मिळते. कौतुक म्हणूनही चित्रकलेला फारसे महत्त्व मिळताना दिसत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : सात वर्षानंतर शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना उघड

बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि सत्यजित रे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते चंद्रमोहन कुलकर्णी यांना भारतरत्न सत्यजित रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी कुलकर्णी बोलत होते.

हेही वाचा – पुणे : रँग्लर परांजपे बंगला काळाच्या पडद्याआड; डेक्कन जिमखान्यावरील वैभव

फाउंडेशनचे अध्यक्ष सोमेश्वर गणाचार्य, सचिव सुरेश टिळेकर, विश्वस्त शिवानी आकाश चिल्का आणि सुचित्रा देशपांडे या वेळी उपस्थित होत्या. कुलकर्णी म्हणाले की, सत्यजित रे यांची चित्रकला मला कायमच समकालीन वाटत आली आहे. चित्रकलेत सध्या वर्गवारी केलेली दिसते. त्यातही व्यावसायिक कलाकाराकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन संकुचित आहे. मात्र, आपल्या कलेच्या माध्यमातून योग्य ते अर्थार्जन करण्यात काहीच गैर नाही. असे करणे म्हणजे आपली कला दावणीला बांधणे आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कल्पना करून रेखाटन काढण्याची पद्धती आता मागे पडली आहे, ही खेदाची बाब आहे. कलेच्या माध्यमातून होणारा संवाद मला कायमच महत्त्वाचा वाटतो.

देशमुख म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील कलाकाराला त्याला कलेच्या माध्यमातून व्यक्त होताना कसलेही दडपण नसणे हे सशक्त समाजाचे लक्षण असते. सध्याच्या काळात कलावंतांना मुक्त वातावरण देण्याची जबाबदारी समाजाची आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painting is still neglected in our country pune print news amy