पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिनीचे काम संथगतीनेच सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून या कामाची प्रक्रिया सुरू आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम अद्यापपर्यंत केवळ ३५ टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे २०२५ अखेरपर्यंत दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरवासीयांना अतिरिक्त पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या शहराला पवना ५१०, आंद्रा धरणातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६१० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी पुरवठा केला जात आहे. मागील पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित, अपुरा व कमी दाबाने होतो. शहराची झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या चारही बाजूंनी मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था विकसित होत आहेत. परिणामी, शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेने आंद्रा धरणातून शंभर आणि भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले. मात्र, भामा आसखेड जलवाहिनीचे कामही संथगतीनेच सुरू आहे. भामा आसखेड धरण परिसरात बांधण्यात येत असलेल्या अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम ५२ टक्के पूर्ण झाले आहे. तर, जलवाहिनी टाकण्यासाठी ज्या जागेचा ताबा मिळाला आहे, अशा ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा :दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली

जलवाहिनीचा ४० टक्के भाग राज्य शासनाच्या आस्थापनेअंतर्गत येत असल्याने त्यांच्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत आणि वन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या आस्थापनांकडून परवानगी घेतली जात आहे. नुकतीच राज्याच्या वन विभागाकडून परवानगी मिळवण्यात महापालिकेला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून परवानगी दिली जात असली तरी जागा मालक जागेचा ताबा देण्यास तयार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जागा ताब्यात घेण्यास विलंब होत आहे. त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत.

या प्रकल्पाच्या जलवाहिनीसाठी सुमारे १६२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी ऑगस्ट २०२० दरम्यान आदेश देऊनही ठेकेदाराने पहिले अडीच वर्षे विलंब केला होता. २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून एक वर्ष उलटले तरी ५० टक्के देखील काम पूर्ण झाले नाही. हे काम करताना स्थानिकांचा विरोध वाढल्याने महापालिकेकडून ठेकेदाराला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तरी देखील पोलीस संरक्षणातही कामाला गती प्राप्त होताना दिसत नाही. २०२५ पर्यंत कामाची मुदत आहे. तो पर्यंत हे काम होणार नसल्याचे चित्र आहे. कामाला गती देऊन काम वेळेत पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, कामास विलंब केला जात आहे. शहरातील नागरिकांचाही रोष वाढत आहे. कामाला असणारी संथगती पाहता संबंधित ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. तरीही वेळेत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत देखील टाकले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :Shankar Jagtap and Nana Kate: शंकर जगताप यांच्या भेटीनंतर नाना काटेंची माघार

समाविष्ट भागाला होणार फायदा

पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून पाणी घेतले जाणार आहे. जलसंपदा विभागाने शहरासाठी प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी कोटा मंजूर केला आहे. त्यासाठी धरणापासून चिखलीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिखलीसह तळवडे, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, दिघी, बोपखेल, भोसरीचा काही भाग, मोशी प्राधिकरण आदी भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे.
ganesh.yadav@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad city water supply bhama askhed water pipeline project work pune print news ggy 03 css