पिंपरी- चिंचवड: मावळमधील किन्हई गावाजवळील इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण पिंपरी-चिंचवड शहरातील घरकुल येथील राहणारे आहेत. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. पाच मित्र पोहायला गेले होते. पैकी, तिघांचा पोहताना दम लागल्याने मृत्यू झाला आहे. अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहित उर्फ गौतम कांबळे, विशाल उर्फ राज दिलीप आचमे आणि आकाश विठ्ठल कोरडे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित, आकाश आणि विशाल हे इतर दोन मित्रांसह मावळमधील किन्हई गावाजवळील इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेले होते. तिघेजण पाण्यात उतरले. इतर दोघेजण नदीच्या कडेला बसले होते. पोहत असताना तिघांना दम लागला आणि ते बुडाले. तिघेही दिसत नसल्याने इतर दोन्ही मित्रांनी आरडाओरडा केला. पोलीस, अग्निशमन दल आणि एन.डी.आर.एफ आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नांनंतर दोन तासांनी त्यांचा मृतदेह हाती लागला. धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनस्थळी मावळ वन्यजीव रक्षक टीमदेखील दाखल झाली होती. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Story img Loader