काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची आहे. त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा अपमान केला आहे. काँग्रेसने सत्तेसाठी कायम तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. आताही काँग्रेसकडून दलित, आदिवासी आणि मागासवगर्यीय समाजातील एकजूट तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच आपण एक राहू तर सेफ राहू, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे. तसेच हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या युवराजांकडून वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा करून दाखवावी, असं आव्हान देत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. तिथे रोज घोटाळे समोर येत आहेत. जनतेचा लुटलेला पैसा काँग्रेसकडून महाराष्ट्रातील निवडणुकीत वापरला जातो आहे. आम्ही जनतेच्या पाठिंब्याने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करून दाखवलं. पण काँग्रेस आता ते परत लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेस पक्ष आता पाकिस्तानची भाषा बोलू लागला आहे”, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदील काढल्याने राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”

“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची”

“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची आहे. त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा अपमान केला आहे. काँग्रेसने सत्तेसाठी कायम तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. आताही काँग्रेसकडून दलित, आदिवासी आणि मागासवगर्यीय समाजातील एकजूट तोडण्यचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जनतेने त्यांच्यापासून सावध रहायला हवे. एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या युवराजांकडून वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा करून दाखवावी”, असं आव्हान त्यांनी दिलं.

हेही वाचा – Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”

“महायुती आहे तरच महाराष्ट्राची गती आहे”

“महायुती आहे तरच महाराष्ट्राची गती आहे. तरच प्रगती आहे. महायुती सरकारने राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. महिलांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या. लाडकी बहीण योजनेची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. मात्र, काँग्रेस ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी त्यांची लोक न्यायालयातही गेली आहेत. पण काहीही झालं तरी ही योजना बंद होणार नाही. आगामी काळात महायुती सरकार राज्यात वेगाने विकासकामे करणार आहे”, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi criticized congress in pune mahauti rally spb