पुणे : पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुढे आल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेही (पीएमआरडीए) त्यांच्या हद्दीतील खड्ड्यांची धास्ती घेतली आहे. मात्र, रस्ते दुरुस्तीची जबाबदारी झटकताना रस्त्यांच्या दुरवस्थेला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम करणारी कंपनी जबाबदार असल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

हिंजवडीतील आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दररोज हाल सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनसह अनेक संघटना सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना न झाल्याने पावसाळ्यात आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या आणखी वाढल्याचे दिसून आले होते. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर भागातील रस्त्यांची अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाहणी करण्यात आली होती. मात्र, रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची, यावरून मात्र पहिल्यापासूनच मेट्रो, पीएमआरडीए आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा >>> डोळ्यांचे पारणे फिटणार?

या सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रत्येक यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कोंडी वाढत असल्याचेही दिसले होते. त्यातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पुणे पोलिसांना पत्र दिल्याने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पीएमआरडीए प्रशासनाने ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा, वडगाव शेरीतील दुर्घटना

‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा,’ या तत्त्वावर शिवाजीनगर-हिंजवड मेट्रो मार्गिकेचे काम करणाऱ्या पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. ‘पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडकडे संबंधित भागातील रस्त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांपासून गणेश खिंड, पाषाण, बाणेरसह कृषी महाविद्यालयाच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित रस्ते कायम वर्दळीचे असल्यामुळे या रस्त्यावरून शेकडो वाहनांची वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे चालकांना खड्डे चुकवत त्यातून मार्ग काढावा लागतो. संबंधित यंत्रणेने करारानुसार रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र वारंवार सांगून देखील पीआयटीसीएमआरएल याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे,’ असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची सूचना रस्त्यांची दुरवस्था झाल्याने येत्या बुधवारपर्यंत (२५ सप्टेंबर) रस्ते पूर्ववत करावेत, असे डाॅ. योगेश म्हसे यांनी या नोटिशीत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी (२६ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. म्हणजे या दौऱ्यापूर्वीच रस्ते दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या पत्रानंतर पुणे पोलिसांनीही पुणे महापालिकेला पत्र पाठवून पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त करण्याबाबत कळवले आहे.