पिंपरी : सन २०१९ मध्ये पहाटे सरकार बनविण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला. राष्ट्रपती राजवट उठली. असे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का, राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? मी जे सांगितले ते समजणा-यांना समजते असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पवार २२ फेब्रुवारी चिंचवडमध्ये आले होते. पिंपळेसौदागर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार निलेश लंके, अतुल बेनके, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले उपस्थित होते.

हेही वाचा >>> राज्य सेवा परीक्षेतील बदल : ‘एमपीएससी’च्या निर्णयावरून आता न्यायालयीन लढाई? 

शरद पवार म्हणाले, सहसा मी पोटनिवडणुकीतील प्रचाराला जात नसतो. पण, एकेकाळी मला देशाच्या संसदेत पाठविण्यास या मतदारसंघाने हातभार लावला आहे. महाविकास आघाडी एकत्रित काम करत आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असलो. तरी मी या जिल्ह्यातील आहे. येथून चारवेळा निवडून गेलो. लोकांशी माझे संबंध आहेत. भेटीगाठी होतात. यासाठी मी आलो आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या अन्य सहका-यांना हवे तसे यश मिळाले नाही. एक काळ असा होता महापालिका, अन्य संस्थामध्ये जनतेचा पाठिंबा आम्हा लोकांना होता. मधल्या काळात दोन निवडणुकांत एक वेगळे चित्र या ठिकाणी दिसले. बदल झाला; पण या बदला संबंधी सर्वसामान्य लोकांमध्ये अनुकूल अशी प्रतिक्रिया येत नाही. निवृत्त झालेल्या काही वरिष्ठ अधिका-यांनी वर्ष-दीड वर्षापूर्वी सांगितले होते की, या ठिकाणी शहराचे वाटप झाले आहे. विकासापेक्षा अर्थकारणाला महत्व वाढले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा सुरू; वाचा सुनावणीची प्रत्येक अपडेट…

 आम्ही येथील सत्ता नसताना निदान संघटनेची बांधणी महाविकास आघाडी म्हणून करू शकलो. विकासाला गती देणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडचा लौकिक होता. तो पुन्हा प्रस्थापित करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी स्वीकारली आहे. शहराच्या विकासात आमच्या पक्षाचा हातभार मोठा होता ही गोष्ट नाकारू शकत नाही. मागीलवेळी लोकांनी बाजूला केले. लोकशाहीमध्ये जे लोक सत्तेवर बसवतात ते लोक सत्तेपासून बाजूलाही काढतात. सत्तेवर बसविल्यावर पाय जमिनीवर ठेवून चालावे लागते. ते हवेत ठेवून चालत नाही. आणि बाजूला केले म्हणून नाऊमेद होवून चालत नाही. पुन्हा एकदा स्थान प्रस्थापित करावे लागते. आमचे सहकारी तसे काम करत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे चित्र पूर्ववत होईल याची मला खात्री आहे.

हेही वाचा >>> राज्यपालांना दिलेले पत्र प्रसिद्ध करा -पवार

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील बंडखोरीबाबत बोलताना ते म्हणाले, माझा मागील ५० वर्षांचा निवडणुकीचा अनुभव आहे. ऐनवेळेला बंडखोरी करुन काही दिवस वर्तमानपत्रात चर्चेत राहता येते; पण मतांच्या परिवर्तानात ते हळूहळू खाली जातात. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आणि त्यानंतर अपक्षाची चर्चा होते. ती आता खाली आलेली मला दिसते. नुसतीच खाली नाही. हळूहळू उमेदवाराचे नाव लोकांसमोर आहे की नाही अशी स्थिती आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होणार आहे. शिवसेनेबरोबर युती केलेले प्रकाश आंबेडकर हे अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराला येत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला. त्यामुळे त्यावर आम्ही भाष्य करण्याचे काही कारण नाही.

चिंचवडमध्ये बदलला अनुकूल असे चित्र

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या आमदार भाजपचे होते. त्यामुळे साधारणत: सहानुभूतीचा लाभ त्यांना मिळू शकतो ही गोष्ट नाकारता येत नाही. आज मात्र तसे चित्र या ठिकाणी नाही. इथे बदलाला अनुकूल असे चित्र दिसते. भाजप- शिवसेनेचे नेते शहरात ठाण मांडून असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, नेत्यांच्या गर्दीमुळे निवडणूक जिंकता येते असा काही अनुभव मला नाही. मर्यादित लोकांवर लक्ष व्यवस्थित केंद्रित केले. तर, निवडणूक जिंकता येते. मी आतापर्यंत १४ निवडणुका लढलो. मी एखाद्या दुस-या सभेशिवाय कधीही प्रचाराला सुद्धा जावे लागले नाही.

सत्तेचा गैरवापर करुन शिवसेनेचे नाव, चिन्ह शिंदे यांना दिले

सत्तेचा गैरवापर करुन एखादा राजकीय पक्ष, त्याची खून (चिन्ह) या सगळ्याच गोष्टी कोणी हिसकावून घेते किंवा पळवते हे कधी या देशात घडलेले नव्हते. पक्षामध्ये अंतर पडले. काँग्रेस आय आणि काँग्रेस एस असे दोन पक्ष झाले होते. काँग्रेस एसचा मी अध्यक्ष होतो. काँग्रेस आयच्या प्रमुख इंदिरा गांधी होत्या. त्यावेळेला काँग्रेस नाव वापरण्याचा मला अधिकार होता. नाव काढून घेतले नाही. त्यांनी हात घेतला आणि आम्ही घड्याळ घेतले. त्याला निवडणूक आयोगाने कधी अडविले नाही. इथे निवडणूक आयोगाचे वैशिष्ट्ये असे आहे की पक्षाचे नाव, चिन्ह हे सगळे दुस-याला देण्याचा निर्णय आजपर्यंत या देशाच्या इतिहासात कधी घडला नाही. पण, मला लोकांचा अनुभव आहे. ज्यावेळेला सत्तेचा अतिगैरवापर होतो. एखाद्या पक्षाला, नेतृत्वाला नाउमेद करण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला लोक त्या पक्षाच्या मागे उभा राहतात. मला १०० टक्के खात्री आहे. लोकांशी बोलताना असे दिसते की नेते लोक शिवसेना सोडून गेले. पण, कट्टर शिवसैनिक १०० टक्के उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. हे ठिकठिकाणी दिसते. त्याची प्रचिती आगामी काळत येणा-या निवडणुकीत कळेल.

निर्णय कोण घेतेय याची शंका आम्हाला येत आहे. आयोग निर्णय घेतोय की आयोगाला कोणाचे मार्गदर्शन आहे. असे निकाल यापूर्वी कधी झाले नाहीत. पक्षात फुटी झाल्या. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा फुटी झाल्या. पण, चिन्हासकट संबंध पक्ष काढून घेतला आणि आणखी कोणाला दिला हे कधी घडले नव्हते. हे जे घडले. त्याच्या पाठीमागे कुठली तरी मोठी शक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय तांत्रिक नियमांना धरुन झाला नाही असे वाटते का याबाबत विचारले असता ते म्हणाले, १०० टक्के तांत्रिक नियमांना धरुन निर्णय झाला नाही. जे झाले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. त्यात काही वाद नाही. पण, हे ज्यांनी केले आहे. त्यांना आज नाही उद्या ज्यावेळेला संधी मिळेल. त्यावेळेला लोक यासंबंधीचा निर्णय घेतील. धडा शिकवतील. सत्तेचा वापर करुन पक्ष काढून घेणे या देशात कधी घडले नव्हते. अशोक चव्हाण, संजय राऊत यांना धमक्या येत असल्याबाबच विचारले असता ते म्हणाले, जी परिस्थिती आहे ती ठिक नाही. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. चौकशी केली पाहिजे. आगामी काळात होणा-या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन दिसेल अशी माझी खात्री आहे, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President rule early morning swearing ajit pawar sharad pawar statement pune print news spt 17 ysh
Show comments