लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : श्रावण महिन्यातील उपवास, सण – उत्सवांमुळे गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. राज्यांतर्गत मागणीसह गुजरात, मध्य प्रदेशातून मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात प्रति किलो चार ते पाच रुपये तेजी आली आहे. ही तेजी दिवाळीपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज आहे.

श्रावण महिन्यामुळे राज्याच्या अंतर्गत बाजारातून गुळाला मागणी वाढली आहे. शिवाय गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही मागणी वाढली आहे. आगामी नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन), श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रावणी पोळा, ऋषीपंचमी, गौरी – गणपती, दसरा आणि दिवाळीपर्यंत सण – उत्सवांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे गुळाच्या दरात आलेली तेजी दिवाळीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज गुळाचे व्यापारी जवहारलाल बोथरा यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-दहावी, बारावीची परीक्षा यंदा लवकर; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखा जाहीर

राज्यातील गुळाचा मुख्य हंगाम दसऱ्यापासून सुरू होतो. सध्या बाजारपेठांमध्ये सध्या पुणे जिल्ह्यातील पाटस, शिरूर भागातील आहे. त्यामुळे बाजारात गुळाची उपलब्धता कमी आहे. शिवाय ज्या ठिकाणी गुऱ्हाळे सुरू आहेत, त्या ठिकाणीही संततधार पावसामुळे उसाची तोडणी, वाहतुकीत अडचणी येत आहेत. गुऱ्हाळ घरात पाणी शिरत आहे. जळण ओले होत आहे. त्यामुळे गुऱ्हाळ घरे संथ गतीने सुरू आहेत. शिरूर, पाटस परिसरातील हंगाम नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर कराड, कोल्हापूर परिसरातील गुऱ्हाळे दसऱ्यानंतर सुरू होतील, अशी माहिती पाटस येथील गुऱ्हाळ चालक अभिजित खळदकर यांनी दिली.

आणखी वाचा-बनावट तिकिटाच्या आधारे विमान प्रवास करण्याचा प्रयत्न करणारा तरुण गजाआड

गुळ ५० ते ६५ रुपये प्रति किलो

श्रावण महिन्यामुळे वाढलेली गुळाची मागणी आणि शीतगृहामध्ये गूळ शिल्लक नसल्याने व्यापाऱ्यांनी गुळाची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे प्रति किलो सरासरी चार ते पाच रुपयांनी दरवाढ झाली आहे. सांगली, कोल्हापूर परिसरातील दर्जेदार गुळाला कायमच मागणी असते. प्रामुख्याने कराड, सांगली, कोल्हापुरात कर्नाटकच्या सीमा भागातून गुळ विक्रीला येत असतो. पण, तो दर्जेदार असत नाही. सध्या घाऊक बाजारात एक नंबरच्या दर्जेदार गुळाला ४५ रुपये किलो, दोन नंबरच्या गुळाला ४३ रुपये आणि तीन नंबरच्या गुळाला ४१ रुपये दर मिळत आहे. गुळाची किरकोळ विक्री ५० ते ६५ रुपये किलो दराने होत आहे.

श्रावण महिन्यापासून सण – उत्सवाला सुरूवात होते. त्यामुळे मागणी वाढून दरात तेजी येते. ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहते. सध्या पाटस, दौंड, शिरूर परिसरातील गुळ बाजारात येत आहे. दसऱ्यानंतर कराड, सांगली, कोल्हापुरातील दर्जेदार गुळ बाजारात येण्यास सुरूवात होईल. -जवहारलाल बोथरा, गुळाचे व्यापारी.