अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पिंपरी-चिंचवड़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणी पुरवठा आज धरणग्रस्तांनी रोखून धरत आंदोलन केले. पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी पवना धरणग्रस्त कृति समितीच्यावतीने आज हे पाणी बंद आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजल्यापासून पवनेचे पाणी अडवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, जमिनीचा योग्य मोबदला द्या, पुनर्वसनामध्ये सुविधा पुरवा, पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडवा. या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरणातून एक थेंबही पाणी सोडणार नसल्याचा पवित्रा यावेळी धरणग्रस्तांनी घेतला. पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील अनेक गावांची तहान या धरणाच्या पाण्याने भागते. त्यामुळे हा पाणी प्रश्न आता पेटण्याची चिन्हे आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून अशा मागण्या वेळोवेळी केल्या जात आहेत. मात्र, त्यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नाहीतर यापेक्षा ही उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या मागण्या :

  • शेतकऱ्यांना लावलेला १६ एकरचा स्लॅब रद्द करावा
  • त्यांना धरणग्रस्त समजून त्यांचे संकलन यादीत समावून घ्यावे
  • भूमिहीन शेतमजुरांची नावे वाटप यादीत समाविष्ट करून पुनर्वसनाचा लाभ द्यावा
  • उपविभागीय कार्यालय पुन्हा पवनानगर येथे स्थलांतरित करावे
  • धरणासाठी बांधलेल्या वसाहतींमधील अतिक्रमणे हटवून सर्व नागरी सुविधा देण्यात याव्यात
  • धरणग्रस्तांना घरासाठी भुखंड, गाळे उपलब्ध करून घ्यावेत
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protestors stop water flow of pawana dam for pimpri chinchwad city