७४ टक्के,तर २१ टीएमसी इतका चार धरणात पाणी साठा जमा
मागील काही दिवसांपासून पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले. पण, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय मागे घेत आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे: अल्पवयीन असताना केला विनयभंगाचा गुन्हा; सात वर्षांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा नियोजनाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस येथे अधिकारी वर्गासोबत बैठक पार पडली.
त्या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे शहर आणि जिल्हय़ातील पाणी नियोजनाबाबत मे महिन्यात बैठक झाली होती. त्यावेळी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली होती. तेव्हा पाऊस उशिरा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आठवड्यामधून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच जून आणि जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस कमीच झाला. पण, जुलै महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे आता पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला असून उद्यापासून सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतीकरिता उद्यापासून नियोजित आवर्तन सोडले जाणार आहे. आता दोन महिन्यांनंतर पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.