पुणे: विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने भरघोस मतदान करित सत्तेत बसवले. राज्यात महायुतीची सत्ता येऊन जवळपास शंभर दिवसांचा कालावधी उलटला आहे.या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अनेक मुद्यांवर आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहे.तर दुसर्या बाजूला महाविकास आघाडीतील अनेक नेते, पदाधिकारी यांची मतदार संघातील काम रखडली आहेत.यामुळे महाविकास आघाडीतील नेते,पदाधिकारी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करताना दिसत आहे.त्यामध्ये शिंदे गट आघाडीवर असून आज पुणे उपशहरप्रमुख आनंद गोयल हे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
मागील महिन्यामध्ये ठाकरे गटातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता.हा मोठा धक्का ठाकरे गटाला बसला होता.या धक्क्यातून ठाकरे गट बाहेर पडत नाही.तोवर ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख आनंद गोयल हे शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.तर आज वडगावशेरी येथील आनंद गोयल यांच्यासह पुणे शहरातील कसबा, कोथरूड या भागातील प्रमुख पदाधिकारी हे देखील शिंदे गटात मुंबईत प्रवेश करणार आहे. कसबा विधानसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे हे देखील ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत.
या पक्ष प्रवेशाबाबत आनंद गोयल यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,मागील आठ वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करीत आलो,एक शिवसैनिक ते उपशहरप्रमुख पदापर्यंत माझा प्रवास राहिला.या संपूर्ण कालावधीत पक्षाकडून देण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत राहिलो.पण पक्षातील वरीष्ठ नेत्यांच पुणे शहराकडे कायम दुर्लक्ष राहिले.यामुळे विकास काम होऊ शकली नाही.तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांच कधी ही कौतुक केले नाही.त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विकास कामांच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश करणार असून शहरात आणखी जोमाने काम करून शिवसेना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.