पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (३० जून) शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने गर्दीच्या नियोजनासाठी शहरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मनोरे उभे करण्यात येणार आहेत.

श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (२८ जून) प्रस्थान होणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (२९ जून) प्रस्थान ठेवणार आहे. रविवारी (३० जून) पालखी सोहळा शहरात दाखल होणार आहे. सोमवारी पालख्यांचा मुक्काम नाना- भवानी पेठेत असणार आहे. मंगळवारी (२५ जून) पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात असणार आहे. पालखी आगमन, मुक्काम, प्रस्थान सोहळा विचारात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

हेही वाचा…पिंपरी : नऊ वर्षानंतर बोपखेलवासीयांना दिलासा, बोपखेल आणि खडकीला जोडणारा पूल ‘या’ महिन्यात होणार खुला

पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यासाठी शहरात पाच हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात राहणार आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हेही वाचा…फर्ग्युसन रस्त्यावरील बार प्रकरण : पुण्यातील तस्कराकडून पार्टीत मेफेड्रोनचा पुरवठा

पालखी सोहळा बंदोबस्त

अतिरिक्त पोलीस आयुक्त – २
पोलीस उपायुक्त – १०

सहायक पोलीस आयुक्त – २०
पोलीस निरीक्षक – १०१

सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक – ३४३
पोलीस कर्मचारी – ३ हजार ६९३

गृहरक्ष दलाचे जवान- ८००
राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या

हेही वाचा…शिक्षक भरतीमध्ये मोठी अपडेट… ३ हजार १५० उमेदवारांची झाली शिफारस!

चोरी, गैरप्रकार रोखण्याठी गुन्हे शाखेचा बंदोबस्त

पालखी सोहळ्यातील गर्दीत चोरट्यांकडून भाविकांकडील ऐवजाची चोरी केली जाते. त्यामुळे सोनसाखळी, मोबाइल चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहेत.