मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यावरुन राज्य सरकारला अल्टिमेटम दिला असल्याने सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यातही आपल्या या अल्टिमेटचा पुनरुच्चार केला होता. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली. यावेळी राज्य सरकारच्या नियमांचे पालन केले जाईल असा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी पी.ए.इनामदार म्हणाले की, “आम्ही दिवसभरात पाच वेळा नमाज पठण करतो आणि त्याचवेळी अजान होते. ही अजान सात ते आठ मिनिटांसाठी असते. पण तरीदेखील सध्या जे काही सतत भोंगे किंवा स्पीकरबाबत आवाहन केले जात आहे, त्याचा विचार करता न्यायालयं आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे यापुढील काळात पालन केले जाईल. आम्ही या नियमांची अंमलबजावणी करणार आहोत”.

पुणे शहरात जवळपास ४०० ते ४५० मशिदी आहेत. तेथील भोंगे किंवा स्पीकरबाबत नोंदणी करण्यासाठी अर्ज देणार असल्याचे त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “आजवर आपण सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे केले आहेत. यापुढे देखील साजरे करुयात”.

राज्यात दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “आजपर्यंत कधीच अशा प्रकारची घटना झाली नाही. यापुढेही आम्ही होऊ देणार नाही”. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोलण्यास नकार दिला.