Pune Porsche Crash Latest Updates: पुणे पोर्श अपघात प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाने अपघात प्रकरणावर ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे. पुण्यातल्या कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत कार चालवून अल्पवयीन मुलाने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांना चिरडलं. ही घटना घडल्यानंतर तातडीने या मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयात हजर केल्यानंतर या मुलाला न्यायाधीशांनी ३०० शब्दांचा निबंध लिहि आणि पोलिसांसह दोन आठवडे काम कर अशी अट घालत जामीन मंजूर केला. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर आणि महाराष्ट्रात चांगलाच संताप पाहण्यास मिळाला. ज्यानंतर या मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. मात्र हा मुलगा बालसुधारगृहातूनही सुटला आहे. तसंच या मुलाने ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे.

बालसुधारगृहातून मुलाची सुटका

अल्पवयीन बिल्डरपुत्राची काही दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. सुटका करताना त्यावेळी त्याला काही अटी शर्थी घालून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्याने ३०० शब्दचा निबंध लिहून देण्याची अट होती. या निंबधामध्ये अपघात घडल्यनंतर काय करायले हवे किंवा अपघात घडू नये म्हणून स्वत: काय काळजी घ्यावी या पद्धतीचा निबंध लिहणे आवश्यक होते. बालनिरीक्षणगृहातून बाहेर पडल्यानंतर अखेर अल्पवयीने मुलाने ३०० शब्दांचा निबंध बालहक्क मंडळकडे वकिलांमार्फत सादर केला. मुलाचे आई- वडिल अजूनही इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे अशीही माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- पुणे पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहातून सुटका

काही दिवसांपूर्वीच या मुलाची बालसुधारगृहातून सुटका

अपघातानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला बालहक्क मंडळासमोर हजर केलं होतं. त्यावेळी त्याला जामीन मिळाला. याशिवाय रस्ते अपघात आणि त्यावर उपाय या विषयावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे त्याला आदेश देण्यात आले.दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर अवघ्या १५ तासांमध्येच त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. त्यामुळे नागरिकांतून एक प्रकारची नाराजी आणि संताप व्यक्त झाला. पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलमं लावली आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला तसंच त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. आता या मुलाने ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे अशी माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा- पुणे पोर्श अपघात: आरोपीला जामीन मिळताच अश्विनी कोस्टाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया; म्हणाल्या…

मे महिन्यात नेमकी काय घटना घडली होती?

पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा हा मुलगा दारूच्या नशेत मोटार चालवत होता. त्याने वाहतुकीचे नियम मोडत ज्या दोघांना उडवले, त्यापैकी अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाला; तर अनिश अवधिया याला रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अपघाताच्या घटनेनंतर पुणे शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि सांगितले, “या प्रकरणातला आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यातील कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील आणि ज्या बारचालकाने या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य दिले, त्यांच्याविरोधातही कलम ७५ व ७७ अंतर्गत कारवाई केली जाईल.” आता या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आणि बारचालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. आता या सगळ्यानंतर या मुलाने ३०० शब्दांचा निबंध लिहिल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.