पुणे : शहरातील गर्दीच्या प्रमुख मार्गांपैकी एक नगर रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मार्गावरील कोंडी फुटून वाहतुकीचा वेग वाढला आहे. नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडी या भागात प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल फेज बदल, चौक सुधारणा, अर्धवर्तुळाकार वळण (यू-टर्न), उजवीकडे वळणात (राईट टर्न) पोलिसांनी बदल केले. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीचा वेग गतवर्षीच्या (जानेवारी ते फेब्रुवारी) तुलनेत यंदा १६ ते १९ टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नगर रस्त्यावरील गर्दीचे प्रमाण ध्यानात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच नगर रस्त्याची पाहणी केली. येरवडा, विमानतळ, खराडी, वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार वाहतूक विभागाने नगर रस्त्यावरील समस्यांचा अभ्यास केला. महापालिका आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे काम करीत उपाययोजना केल्या. येरवडा, शास्त्रीनगर चौकातील कल्याणीनगरकडे जाणाऱ्या उजवीकडील वळणामुळे मुख्य नगर रस्त्यावर कोंडी होत होती. त्यामुळे ही सुविधा बंद करून पुढे अर्धवर्तुळाकार वळण दिल्याने मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी झाली. तर, वडगाव शेरी चौकातून नगरकडे जाताना अग्निबाज प्रवेशद्वारासमोरून उजवीकडे वळण देण्यात आले.

पुण्याकडे येताना उजवीकडे वळण देण्यात आले. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी होऊन वेग वाढण्यास मदत झाली.
विमाननगर चौक (फिनिक्स मॉल) येथे उजवीकडे वळण असल्याने मुख्य रस्त्यावर कोंडी होत होती. पोलिसांनी उजवीकडचे वळण बंद करून चौक सिग्नलविरहीत केला. तर, खराडी दर्गा चौकातील उजवीकडचे वळण बंद करून आपले घर बसथांब्यापासून अर्धवर्तुळाकार वळण केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक सिग्नल विरहीत झाली. येरवडा ते खराडी या भागात केलेल्या या उपाययोजनांनंतर एटीएमएस या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीद्वारे वाहतुकीची वर्दळ पाहून करण्यात आलेल्या विश्लेषणाद्वारे संबंधित भागातील वेग वाढल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षीच्या (जानेवारी-फेब्रुवारी) तुलनेत हा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला आहे. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजना राबविण्यात आल्या.

वाघोली भागात कारवाई

नगर रस्त्यावरील वाघोली भागात सर्वाधिक वाहतूक कोंडींचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या परिसरात विशेष कारवाई केली. यामध्ये वाघेश्वर चौक ते केसनंद फाटा तसेच बकोरी फाट्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमणे, टपऱ्या काढून टाकण्यात आल्या. खड्डे बूजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. वाघोली वाहतूक विभागाच्या हद्दीत ट्रॅव्हल्स वाहनांवर कारवाई करून त्यांना अटकाव करण्यात आला.

३४ हजार खटले, अडीच कोटींचा दंड

नगर रस्त्यांवरील बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करीत यंदा जानेवारी ते १० मार्चपर्यंत तब्बल ३४ हजार ३११ खटले दाखल करून २ कोटी ४८ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रीपल सिट, मद्यप्रशान करून वाहन चालवणे, सिग्नल तोडणे अशा नियमभंगाचा समावेश आहे.

नगर रस्त्यावर मागील काही महिन्यांत केलेल्या उपाययोजनांमुळे कोंडी फुटून वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. सुरळीत वाहतुकीसाठी अनेक ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळे वेग वाढला असून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. अमोल झेंडे, उपायुक्त, वाहतूक शाखा