मतदारयादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया वर्षभर निरंतर चालू असते. मात्र, यादीत आपले नाव आहे का, याकडे पाच वर्षांत कोणी ढुंकून पाहत नाही. कोणत्याही निवडणुका आल्या, की मतदारांचा ‘भाव’ वधारतो आणि राजकीय पक्ष हे अचानक जागे होतात. पण तरीही मतदानाच्या दिवशी यादीत नाव नसणे, बोगस मतदारांची नावे असल्याची ओरड होऊन सदोष मतदारयादीचा गवगवा होतो. तोपर्यंत निकाल लागतो आणि पुन्हा मतदारयादीचा विषय पाच वर्षांसाठी थांबतो. पुण्यात मतदारयादीचा हा गोंधळ नवीन नाही. पुणे ही नगरपालिका असल्यापासून म्हणजे स्वातंत्रपूर्व काळापासून मतदारयादीतील गोंधळालाही इतिहास आहे. तेव्हाही यादीचे गोंधळ असायचे आणि आता अत्याधुनिक युगातही यादीचा गोंधळ थांबलेला नाही. आताही विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव साजरा होणार असताना, मतदारयादीचा गोंधळ घातला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदारयादीतील गोंधळ हा मतदानाच्या दिवशी कायम चर्चेचा विषय असतो. मतदारयादीत नाव नसणे यापासून बोगस मतदारांची नावे यादीत असण्यापर्यंत सर्व प्रकारच्या तक्रारी केल्या जातात. राजकीय पक्ष अशा प्रसंगी प्रशासनाच्या कारभारावर टीका करायला सरसावतात. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक नावे वगळल्याचे किंवा बोगस मतदार समाविष्ट केल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून केले जातात. प्रामुख्याने विजयाची खात्री नसलेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक हे प्रशासनाच्या कारभाराकडे बोट दाखवून मोकळे होतात. मात्र, प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातील मतदारांची नावे आहेत का, हे तपासण्याची तसदी काही राजकीय पक्षांनी घेतलेली नसते. उलट, ऐन वेळी आपल्या विचारांच्या मतदारांचे नाव यादीत यावे, यासाठी त्यांची धडपड असते. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि मतदानाच्या दिवशी प्रशासनावर टीका करण्यात आणि निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात हे राजकीय पक्ष अग्रेसर राहतात.

हेही वाचा : पुणे: जिल्ह्यात नऊ ठिकाणी बंडखोरी; महायुती आणि महाविकास आघाडीसमोर अनुक्रमे पाच व चार ठिकाणी आव्हान

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत आलेल्या मतदारांच्या अर्जांची छाननी करून त्यांचा मतदारयादीत समावेश करता येतो. त्यांची नावे पुरवणी यादीमध्ये समाविष्ट होतात. अशा वेळी राजकीय पक्ष आपल्या मतदारांची नावे यादीत घेण्यासाठी आटापिटा करताना दिसतात. पुरवणी यादीनंतरही मतदारांची नावे नसणे आणि बोगस नावांचा समावेश होण्याचे आरोप राजकीय पक्ष करतच असतात.

पुण्यात राजकीय पक्षांचा आणि उमेदवारांकडून मतदारयादीच्या गोंधळाच्या आरोपांचा इतिहास जुना आहे.

तत्कालीन पुणे नगरपालिकेचे १९२४ ते १९४५ या कालावधीत नगराध्यक्षपद भूषविलेले ग. म. नलावडे यांनी मतदारयादीबाबतीत अनुभव नोंदवून ठेवला आहे. ते पहिल्यांदा १९२८ मध्ये तत्कालीन भांबुर्डा पेठ आणि नारायण पेठ या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी त्यांनी अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारयादीचा अभ्यास केला होता. त्यामध्ये १९२८ ते १९४५ या काळांतील मतदारांच्या याद्यांमध्ये त्यांना अनेक गोंधळाचे प्रकार आढळले होते. मृत, परगावी गेलेल्यांची नावे मतदारयादीत होतीच; पण एकाच व्यक्तीची एकाच पेठेच्या यादीत अनेक नावे असण्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला होता. शिवाय अनेक पेठांमध्ये एकाच व्यक्तीचे नावही त्यांना आढळून आले होते. आणखी एक प्रकार म्हणजे पुण्यातील रहिवाशी नसलेल्यांची नावे मतदारयादीत होती. त्यांच्या निवासाचा पत्ता म्हणून एखादी बखळ किंवा पडके शौचालय दाखविण्यात आले होते. एखाद्या घरमालकाच्या घरामध्ये माणसे दहा ते बारा असायची, पण त्यामध्ये मतदारयादीत वाढ झालेली असायची. घरमालकाने कधी नाव ऐकले नाही, अशा मतदारांची नावे समाविष्ट झालेली असायची. पुरुष आणि स्त्री मतदारांच्या नावातील गोंधळ हा असायचाच. याचा अर्थ पुण्यात मतदारयादीचा गोंधळ हा पूर्वीपासूनच आहे, हे स्पष्ट होते.

हेही वाचा : परस्पर पाठिंबा जाहीर करणाऱ्यांना तंबी, मनसेचा पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

आता विधनासभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारयादीत नाव नसणे, बोगस मतदार असणे, असे आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवनवीन प्रकार त्यामध्ये दिसून येतील. ही संख्या हजारोंची असल्याच्याही तक्रारी येतील. मग मतदारयादीचा कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ मतदारांवर आल्याशिवाय राहणार नाही.

sujit.tambade@expressindia. com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune vidhan sabha election 2024 the history of voter list problem faced by pune voters pune print news spt 17 css