Rahul Gandhi Veer Savarkar Defamation Case: कर्नाटकमधील काँग्रेसच्या एका मंत्र्याने काही दिवसांपूर्वीच वीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर वाद उद्भवला होता. त्यानंतर आता पुणे न्यायालयाने एका जुन्या प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला होता. मार्च २००३ साली इंग्लंडच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीबाबत बदनामीकारक विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याचा त्यांनी आरोप केला होता. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी ५ मार्च २०२३ रोजी इंग्लंड येथे केलेल्या एका भाषणाचा व्हिडीओ यासाठी सादर केला होता.

हे वाचा >> राहुल गांधींच्या विरोधात बदनामीचा आणखी एक खटला? वीर सावरकरांचे नातू सात्यकी यांनी दाखल केली फौजदारी तक्रार

या प्रकरणी राहुल गांधी यांना आता २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंडिया टुडेने सदर बातमी दिली आहे.

सात्यकी सावरकर आपल्या तक्रारीत म्हणाले की, राहुल गांधी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माझे आजोबा सावरकर यांचा जाणूनबुजून अवमान करत आहेत. लंडन येथे ५ मार्च २०२३ रोजी ओव्हरसिस काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी ओढूनताणून सावरकरांना मध्ये आणले आणि त्यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केले. राहुल गांधी सावरकरांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सात्यकी सावरकर काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर आरोप करताना म्हटले की, त्यांनी जाणूनबुजून अशा शब्दांचा वापर केला, ज्यामुळे संपूर्ण सावरकर कुटुंबियांना मानसिक त्रास झाला. त्यामुळेच राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर खटला चालवून त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी. तसेच अब्रुनुकसानीबद्दल त्यांच्याकडून नुकसान भरपाईही मिळावी.

राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत अनेकदा विधान केले आहे. नुकतेच त्यांना नाशिक न्यायालयानेही समन्स बजावले होते. एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने गांधींच्या विरोधात याचिका दाखल केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोली येथे पत्रकार परिषद घेतली असताना राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत विधान केले होते. राहुल गांधींनी जाणुनबुजून आपल्या विधानाद्वारे सावरकरांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू यांच्या वादग्रस्त विधानावर वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी टीका केली होती. ते म्हणाले की, काँग्रेसतर्फे वारंवार सावरकर यांच्याबाबत अपमानजनक विधान केले जात आहे. जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा अशी विधाने केली जातात. राहुल गांधी हे करत आले आहेत आणि आता त्यांच्या पक्षाचे नेतेदेखील अशीच विधाने करत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसकडून फोडा आणि राज्य करा, ही रणनीती वापरली जात असल्याचा आरोप रणजीत सावरकर यांनी केला.