पुणे : राज्यात मोसमी पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. प्रामुख्याने किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. घाटमाथ्यावर मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाचा मुख्य आस (मान्सून ट्रफ) सामान्य ठिकाणी असून, तो सक्रिय आहे. पश्चिम बंगालमधील गंगा नदीच्या खोऱ्यात हवेच्या खालच्या स्तरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीनजीक वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. शिअर झोन मुंबईच्या वरून विदर्भापर्यंत जात आहे आणि गुजरातपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

हेही वाचा – आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत घेता येणार प्रवेश ?

हेही वाचा – पिंपरी : हद्द झाली! मृत जनावरांच्या दहनातही गैरव्यवहार

हवामानविषयक वरील प्रणाली देशाच्या विविध भागांत सक्रिय असल्यामुळे देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे. किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. पश्चिम बंगालमधील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून उत्तर विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.

गुरुवारसाठी इशारा

नारंगी इशारा – कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया.

पिवळा इशारा – सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.