पुणे : नवी मुंबईतील ईएसडीएसकडून ॲडवान्स डाटा सेंटरमध्ये विदा (डाटा) स्थलांतरीत करण्यात येणार आहे. हे काम शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दिवसभर सुरू राहणार आहे. परिणामी शनिवारी (२७ जुलै) राज्यभरातील दस्त नोंदणी कार्यालये बंद राहणार आहेत.याबाबतचे आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी प्रसृत केले. ईएसडीएसकडून विदा स्थलांतर करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. या कामासाठी २४ तासांचा कालावधी लागणार असून या कालावधीत ‘आयसरिता’ दस्त नोंदणीसह सर्व सेवा उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे शुक्रवारी (२६ जुलै) रात्री साडेनऊ वाजल्यापासून शनिवारी (२७ जुलै) रात्री उशीरापर्यंत विदा स्थलांतराचे काम सुरू राहणार आहे. परिणामी शनिवारी राज्यभरातील दस्त नोंदणी कार्यालयांचे कामकाज बंद राहणार आहे.रविवारी (२८ जुलै) राज्यातील जी दस्त नोंदणीची कार्यालये सुरू असतात, त्या कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीचे कामकाज सुरू राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.