लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने विधानसभेसाठी बारा जागांवर दावा केला आहे. निवडणुकीत पक्षाला प्रतिनिधित्व दिले नाही तर, निवडणुकीचा प्रचारही केला जाणार नाही, अशी भूमिका रिपाइंचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाडेकर यांनी सोमावारी पत्रकारांशी संवाद साधला. या बारा जागांपैकी शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघ मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आणखी वाचा-पुणे: मानलेल्या भावाकडून चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार, आरोपी पसार

सत्ता मिळवायची असेल तर,तडजोड करणे आवश्यक आहे, या विचारातून आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेच्या विरोधी असलेल्या राजकीय पक्षांशी युती करण्याचे धैर्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दाखवले. मात्र, या निर्णयाचा फायदा चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांना कमी आणि भाजपला अधिक होत असल्याचे गेल्या १५ वर्षातील चित्र आहे. यामुळे आंबेडकरी समाजात नाराजीचे वातावरण आहे. लोकसभेला रिपाइंला संधी नाही मिळाली. विधानसभा निवडणुकीत किमान १२ जागा मिळाव्यात ही पक्षाची भाजपकडे मागणी आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत, यामुळे हा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी भाजपकडे करण्यात आल्याचे वाडेकर यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-चारित्र्याच्या संशयातून महिलेच्या डोक्यात सिलिंडर घालून खून, विश्रांतवाडी भागातील घटना; पती गजाआड

भाजपने आंबेडकरी चळवळीतून आलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर, आंबेडकरी समाजात महायुतीबद्दल एक सकारात्मक संदेश जाईल. यामुळे महायुतीला पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असा दावाही वाडेकर यांनी केला.