पुणे : Wayanad landslides linked to warming Arabian Sea : केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेमागे अतिवृष्टी हेच प्राथमिक कारण असल्याचे निरीक्षण भूशास्त्र, पर्यावरण संशोधक, अभ्यासकांनी नोंदवले आहे. सखोल अlभ्यासाअंतीच अन्य कारणे समोर येऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले असून, माळीण येथे झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशीच वायनाड येथे भूस्खलन होण्याचा दुर्दैवी योगायोग घडला.

हेही वाचा >>> Wayanad Landslide : वायनाडमधील भूस्खलनाच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४३ वर; अद्यापही अनेकजण बेपत्ता, केरळमध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलनाची दुर्घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), लष्कराचे जवान यांच्या मदतीने बचावकार्य करण्यात येत आहे. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती मिळत आहे. इस्रोने तयार केलेल्या ‘लँडस्लाइड ॲटलास ऑफ इंडिया’नुसार केरळचा समावेश भूस्खलनप्रवण राज्यांमध्ये होतो. भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती आहे. भूस्खलनाच्या घटना प्रामुख्याने माती, खडक, भूविज्ञान आणि उताराची अनुकूल परिस्थिती असलेल्या डोंगराळ भागात घडतात. उतारावरून खडक, दगड, मातीच्या अचानक होणाऱ्या हालचालींना भूस्खलन म्हटले जाते. अतिवृष्टी, भूकंप, बर्फ वितळणे आणि पूर अशी भूस्खलनाची काही नैसर्गिक कारणे आहेत. तसेच उत्खनन, डोंगरफोड, वृक्षतोड अशा मानवी हस्तक्षेपांमुळेही भूस्खलन होऊ शकते.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: वायनाडचे धडे

केरळमध्ये अशा स्वरूपाचे भूस्खल या पूर्वीही झाले आहे. केरळ पश्चिम घाटाच्या दक्षिण भागात आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडून माती वाहून गेल्याने भूस्खलन झाल्याचे प्राथमिक कारण दिसून येते. उतारावरून चिखल वाहून गेल्याने त्याचा फटका मोठ्या परिसराला बसला, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले. पर्यावरण आणि भूगोल अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, की पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मातीचा थर वाहून जाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. केरळमधील दुर्घटनेमध्ये तेच दिसून येते. ही दुर्घटना घडण्यामागे मानवी हस्तक्षेपासारखे काही घटक आहेत का, याचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागेल. केरळमधील भूस्खलनाची दुर्घटना डोंगराळ भागात घडली आहे. त्या भागात जांभा दगड असल्याने त्यातून पाणी झिरपते. पाऊस प्रचंड झाल्यास दगडाखाली असलेला मातीचा भुसभुशीत थर वाहून जाऊ शकतो. वायनाड येथील भूस्खलन अशा प्रकारचे असल्याचे दिसते. ही दुर्घटना आपल्याकडे घडलेल्या तळीये, माळीण येथील दुर्घटनांसारखीच आहे. अन्य घटक कारणीभूत आहेत का, या बाबत सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.