पुणे : ‘भाजपसह अन्य पक्षांतील संधिसाधूंना ऐन वेळी पक्षात घेऊन उमेदवारी देऊ नये,’ असा ठराव काँग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत एकमताने करण्यात आला. हा ठराव करून आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढविण्यासाठी इच्छुक असलेले सनी निम्हण यांच्या पक्ष प्रवेशालाच निष्ठावंतांनी एक प्रकारे विरोध दर्शवल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा ठराव पाठविण्यात आला आहे. या ठरावामध्ये निम्हण यांचा थेट नामोल्लेख नसला तरी, रोख निम्हण यांच्याकडे असल्याचे सूचक इशारे देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला कसबा, पुणे कॅन्टोन्मेंटसह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगरची जागा काँग्रेसला अल्प मतांनी गमवावी लागली होती. मात्र, या मतदारसंघातील काँग्रेसची ताकद वाढल्याचे मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. या मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी आमदार दीप्ती चवधरी आणि मनीष आनंद इच्छुक आहेत. मात्र, सध्या भाजपमध्ये असलेले सनी निम्हण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची हालचाल सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बहिरट, चवधरी आणि मनीष आनंद यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची बैठक काँग्रेस भवनात झाली. त्या वेळी ‘बाहेर’च्यांच्या प्रवेशाला विरोध करण्यात आला. तसा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा >>>अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील व्यक्तींना आशेचा किरण! हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णांमुळे मिळेल जीवदान

ठरावात काय?

‘काँग्रेस सत्तेमध्ये नसताना निष्ठावंतांनी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात सातत्याने संघर्ष केला. सन २०१४ मध्ये संघर्षाच्या काळात शिवाजीनगर मतदारसंघातील संधिसाधू भाजपकडे गेले. काँग्रेसशी गद्दारी करून ‘शत प्रतिशत भाजप’ असा नारा त्यांनी दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ दिल्याचे लक्षात आल्यानंतर संघर्षाच्या काळात काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले संधिसाधू पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच ज्यांनी भाजप उमेदवाराच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे फलक शहरभर लावले, त्यांना पक्षात का प्रवेश द्यायचा, असा प्रश्न उपस्थित करून, काँग्रेस अडचणीत असताना संघर्षाच्या काळात प्रामाणिक आणि नि:स्वार्थीपणे साथ देणाऱ्या निष्ठावंतांना निवडणुकीत संधी द्यावी. त्याला बहुमताने विजयी केले जाईल,’ असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेस अडचणीत असताना संघर्षाच्या काळात प्रामाणिक आणि नि:स्वार्थीपणे साथ देणाऱ्या निष्ठावंतांना निवडणुकीत संधी द्यावी. त्याला बहुमताने विजयी केले जाईल, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे.