पुणे : वाढत्या तापमानामुळे भातासह अन्नधान्य पिके अडचणीत येण्याच्या आणि २०५० पर्यंत शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात १५ टक्क्यांनी घट होईल, अशी भीती ‘मुडीज्’च्या इंडिया : टेम्परेचर बियॉन्ड द हीटवेव्ह ? या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

‘मुडीज्’च्या अहवालात नमूद केलेल्या निष्कर्षांनुसार, जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यात तापमान वाढ, उष्णतेच्या लाटांमध्ये वाढच होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या उन्हाळ्यात भारतासह जगातील अनेक देशांची उष्णतेच्या लाटांमुळे होरपळ झाली. १९९० च्या तुलनेत यंदा उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तापमान वाढ अशीच सुरू राहिली तर प्रामुख्याने भातासह विविध अन्नधान्य पिके अडचणीत येणार आहेत. शेतीच्या उत्पादनांवर विपरीत परिणाम होऊन २०५० पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनात १५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा…डांबून ठेवलेल्या तीन पोपटांची सुटका ‘पेटा इंडिया’, वन विभाग यांची संयुक्त कारवाई

प्रामुख्याने भारतात एप्रिल, मे आणि जूनमध्ये मध्य आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये ‘उष्णतेची लाट’ किंवा ‘गंभीर उष्णतेची लाट’ जाणवली. फक्त जून महिन्यात राजस्थानला ११, पंजाबला १५, हरियाणाला १४, उत्तर प्रदेशाला १८, बिहार, झारखंडला १८, पश्चिम बंगाल १२, ओडिशाला ११ आणि विदर्भाला ३ वेळा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला.

देशाचा ४० टक्के भाग तापला

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार, १६ मे ते १८ जून, या काळात भारताच्या जवळपास ४० टक्के भागाचे कमाल ४० अशांपेक्षा जास्त होते. राजधानी दिल्लीचे तापमान ५० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहचले होते. राजस्थान, उत्तर गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गंगा नदीच्या खोऱ्यातील प्रदेशातील कमाल तापमान जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले.

हेही वाचा…‘नीट-पीजी’च्या तारखेची प्रतीक्षा तर संपली, आता आव्हान परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे…

यंदाच्या उन्हाळ्यात दक्षिण आशियाला तापमान वाढ, उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. जागतिक तापमान वाढीसह एल – निनोचा मोठा परिणाम राहिला. भारतासह मेक्सिको, बांगलादेश, पाकिस्तान किंवा थायलंड या देशांमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसवर पोचले होते. उष्णतेच्या लाटा जास्त वेळा आणि जास्त काळ सक्रिय राहिल्याचेही दिसून आले. – डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग