महाराष्ट्रात पंढरपूरच्या आषाढी वारीला मानाचं स्थान आहे. दरवीर्षी आषाढी वारीच्यानिमित्ताने मोठा पालखी सोहळा असतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीला सुरवात झाली आहे. आज (२९ जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. या पालखीमध्ये हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. आळंदीमधून पंढरपूरकडे जात असताना हजारो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपूरमध्ये पोहचतात.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली असून हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आळंदीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच वारकऱ्यांशी संवादही साधला.

हेही वाचा : “अडीच वर्ष सरकारला बहिणी आठवल्या नाहीत का?”, लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“संत ज्ञानेश्वर महाराजांना मी नमन करतो. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यासाठी येण्याचं भाग्य मला लाभले. मी संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि विठुरायाकडे प्रार्थना करतो की, बळीराजा संकट मुक्त होवो. शेतकऱ्यांवरील सर्व संकट दूर होवोत. चांगला पाऊस होवो. तसेच राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो, अशी प्रार्थना मी करतो”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. तसेच इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदुषणमुक्त करण्यासाचे काम सरकारचे आहे. इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी ८०० कोटींची तरतूद नगर विकास विभागाने केलेली आहे, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितलं.

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला आहे. माऊलींच्या पालखीचं हे १९३ वं वर्ष आहे. इंद्रायणी काठावर लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता. आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी केली असून विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा यावेळी उत्साह पाहायला मिळाला आहे.