पुणे: मुस्लीम महिलांचे शोषण करणारा तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, समान नागरी कायद्याचे पुरस्कर्ते, दगडावरची पेरणी या पुस्तकाचे लेखक आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्य़क्ष सय्यदभाई यांचं शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
घरामध्ये तोल जाऊन पडल्यानंतर सय्यदभाई यांना ३० मार्च रोजी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र वृद्धापकाळ आणि श्वसनाचा त्रास यामुळे त्यांच्या प्रकृतीची गुंतागुंत वाढली. उपचार सुरू असतानाच दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
सय्यद महबूब शहा कादरी हे सय्यदभाई यांचे मूळ नाव. हमीद दलवाई यांच्या प्रभावातून ते मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कृतीशील कार्यकर्ते झाले. पुढे त्यांनी मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले. एकेकाळी अहल-ए- हदिस पंथाचे कट्टर अनुयायी असलेल्या सय्यदभाईंच्या बहिणीला तिच्या नवऱ्याने तोंडी एकतर्फी तलाक दिला. घडल्या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या सय्यदभाईंनी अनेक मुस्लीम धर्मगुरू आणि इतर मंडळींशी संपर्क साधला. पण त्यांनी ही धर्माची बाब आहे असं सांगून हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर मार्गदर्शनासाठी त्यांनी भेट हमीद दलवाईंशी झाली आणि त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.
१८ एप्रिल १९६६ रोजी हमीद दलवाईंनी तलाक पीडित मुसलमान महिलांचा मोर्चा मंत्रालयावर आयोजित केला आणि मार्च १९७० मध्ये मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केलीय या प्रवासात हमीद दलवाईंसोबत खांद्याला खांदा लावून सय्यदभाई उभे होते. सय्यदभाई यांच्या कार्याचा केंद्र सरकारने पद्मश्री या खिताबाने सन्मान केला होता. केंद्र सरकारने तोंडी एकतर्फी तलाकवर बंदी घातल्यानंतर मंडळाने याचे समर्थम केले. २०१७ मध्ये सय्यदभाई आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बहुपत्नीत्व, निकाह आणि हलाला अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घालावी अशी मागणी केली होती.