लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : लोकसभा निवडणूक निष्ठेची, स्वाभिमानाची लढाई होती. शिरूर लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी, सुजाण मतदारांनी निष्ठेला कौल दिला आहे, अशी भावना डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे यांनी व्यक्त केली. गेले आठ महिने दररोज सोळा-सोळा तास काम करत होतो. कार्यकर्त्यांसह कुटुंबही प्रचारात सक्रिय होते, असेही त्यांनी सांगितले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत डॉ. कोल्हे ५० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. अश्विनी कोल्हे रांजणगाव येथील मतमोजणी केंद्रावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी वाचा-Maval Lok Sabha Election 2024 Result Live मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे विजयी! केवळ औपचारिकता बाकी; विरोधकांना मतदारांनी जागा दाखवून दिली – श्रीरंग बारणे

निवडणुकीत कामच बोलते असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाल्या, की शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीचा फायदा डॉ. अमोल कोल्हे यांना निश्चितच झाला. पण, डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदारसंघात काम केले आहे. विरोधकांनी मतदारसंघात संपर्क नसल्याचा अपप्रचार करण्याचा केलेला प्रयत्न सुजाण मतदारांनी हाणून पाडला. गेल्या पाच वर्षांत केलेले काम, हाती घेतलेले प्रकल्प आता येत्या काळात पुढे नेण्याची, पूर्ण करण्याची संधी मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self respecting and intelligent voters gave vote to work and loyalty says dr amol kolhes wife ashwini kolhe pune print news ccp 14 mrj