पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत राज्याचे मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दबाव कार्यपद्धतीचा वापर करत इच्छुक कार्यकर्त्याच्या आत्मसन्माला धक्का लावण्यााचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला. या मतदारसंघातून पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल, याबाबत ‘आशावादी’ असल्याचे स्पष्ट करत बालवडकर यांनी मंत्री पाटील यांना थेट आव्हान दिले आहे.

आगामी विधानसभेसाठी कोथरूड मतदारसंघातून अमोल बालवडकर हे इच्छुक असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नेमून पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून उमेदवार कोण असावा, यासाठी मतदान प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दबाव पद्धतीचा वापर केल्याचा आरोप बालवडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा – Video: आर्थिक व्यवहाराच्या आरोपाने मंत्री अब्दुल सत्तार संतापले; बाजार समित्यांच्या परिषदेतून काढता पाय

निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करणे हा पक्षातील लोकशाहीचा भाग आहे. परंतु उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इच्छुक कार्यकर्त्यांचा आत्मसन्मानाला धक्का लावण्याच्या दबावाच्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप करत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पाटील यांना थेट आव्हान दिले. शहरातील सहा मतदारसंघात निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या मतदान प्रक्रियेत विद्यामान आमदारांनी पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकत आपलेच नाव सुचविल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोथरुड मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी करणारे माजी नगरसेवक बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेत आमदार पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

बालवडकर म्हणाले, पक्षाचा कार्यकर्ता हा निडर असावा. चुकीचे काही होत असेल तर ते मांडणारा असला पाहिजे. भाजपबद्दल काही तक्रार नाही. पण काही व्यक्तींबद्दल तक्रार आहे. पक्षाचे निरीक्षक मतदारसंघात आले होते. त्यासाठी काही ठरविक पदाधिकाऱ्यांना निरोप पाठविण्यात आले होते. निरीक्षकांसमोर विधानसभेसाठी इच्छुक असलेले अमोल बालवडकर आणि शाम देशपांडे यांचे नाव घेवू नये, यासाठी पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय वरिष्ठ नेते घेतीलच पण काही नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा जनमाणसात मलिन होत आहे.

हेही वाचा – नराधम बापाकडून मुलीवर बलात्कार, शाळेच्या ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमात मुलीकडून वाच्यता

ज्यांनी हा प्रकार केला ते कोथरूडमधील नेते खूप मोठे आहेत. त्यांच्याबाबत कोणत्या वरिष्ठांकडे जायचे, असा प्रश्न असल्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मत मांडत आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट असते तर हा प्रकार झालाच नसता. कोथरुडमधून गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत आहे. परंतु, भाजपने निरीक्षक प्रक्रियेत मला बहिष्कृत केले. मंत्री चंद्रकांत पाटील माझ्या कार्यक्रमाला येत नाहीत. इच्छुक होणे हा गुन्हा आहे? मला भविष्याची चिंता नाही. आत्मसन्मान दुखावला जात असेल तर तो मांडला पाहिजे. माझ्याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून होत असलेले हे प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांना देखील कळविला आहे. मात्र त्यांच्याकडून देखील अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही. कोथरुडमधून मतदारांचा प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी आपले प्राधान्य असते. या मतदारसंघात करत असलेले काम पाहता पक्षाकडून निश्चितपणे आपल्यालाच उमेदवारी दिली जाईल, याबाबत ‘आशावादी’ असल्याचे सूचक वक्तव्य बालवडकर यांनी केले.

आमदारांना अहंकार आलाय

भाजपमधील लोकशाही संपविण्याचा प्रयत्न होत आहे. आमदार पाटील यांना अहंकार आलाय का? असा प्रश्न अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला. पक्षाचा सर्व्हे गोपनीय होता. तो लीक करण्यात आला. खरा सर्व्हे जनतेचा आहे. आतापर्यंत ३५ हजार कुटुंबीयांना संपर्क केला आहे. त्यामध्ये बहुतांश नागरिकांनी मलाच विधासभेसाठी पसंती दिली आहे. निरीक्षकांनी हा सर्व्हे पहावा, त्यानंतरत निर्णय घ्यावा, असे आवाहन देखील बालवडकर यांनी केले.