राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील फिंगर प्रिन्टची (अंगुली मुद्रा) माहिती संकलित करणारे ‘सव्र्हर’ गेल्या एक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे एखादे फिंगर प्रिन्ट पडताळून पहाणे आणि ते दुसऱ्या फिंगर प्रिन्टशी जुळवणी करण्यास उशीर लागत आहे. त्याचा परिणाम विविध गुन्ह्य़ांच्या तपास कामावर होत आहे.  
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (सीआयडी) येथे राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील फिंगर प्रिन्ट संकलित करण्याचे सव्र्हर आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात गोळा केलेले फिंगर प्रिन्ट हे एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या सव्र्हरवर अपलोड केले जात होते. सीआयडीने फिंगर प्रिन्टच्या सव्र्हरचे काम कंत्राटी पध्दतीने एका कंपनीला दिले होते. त्यांचा करार संपल्यानंतर या संदर्भात पुन्हा निविदा काढण्यात आली. मात्र, हे सव्र्हर चालवतील अशी आवेदने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आली नाहीत. त्यामुळे गेल्या एक वर्षांपासून हे सव्र्हर बंद आहे. त्यामुळे विविध गुन्ह्य़ांच्या तपासकामात विलंब होत आहेत.
याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख एस. पी. यादव यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षांपासून फिंगर प्रिन्टचे सव्र्हर बंद आहे. त्यामुळे तपास कामाला उशीर होत आहे. आमच्याकडे ९५ लाख लोकांचे फिंगर प्रिन्टस आहेत. हा सर्व डेटा हार्ड डिस्कवर कॉपी केलेला असून या फिंगर प्रिन्टचे डिजिटलायझेशन करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त फिंगर प्रिन्टचे डिजिटलायझेशन झाले आहे. सध्या राज्यात वेगवेगळ्या पाच ठिकाणांहून हे काम केले जात आहे. त्याच बरोबर फिंगर प्रिन्टचा दुसरा ‘डेटाबेस’ तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.
सीआयडीचे माजी प्रमुख माधव कर्वे यांनी सांगितले की, फिंगर प्रिन्ट सव्र्हर बंद पडल्यानंतर ते सुरू करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. हे सव्र्हर बंद पडल्यामुळे तपासाचे काम करणारी यंत्रणाच अधू होऊन बसते. त्यामुळे तपास कामाच्या दृष्टिकोनातून हे सव्र्हर सुरू असणे फार महत्त्वाचे आहे.