पुणे : तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी यापूर्वी चार वेळा लाभलेले शरद पवार यंदा प्रथमच स्वागताध्यक्ष झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरहद संस्थेच्या वतीने २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर हे संमेलन होणार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये होणारे संमेलन यशस्वी करण्याच्या उद्देशातून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या पुढील कार्यक्रम आणि व्यवस्थांंमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे संजय नहार यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, संयोजन समितीचे डॉ. सतीश देसाई आणि सरहद संस्थेचे शैलेश पगारिया या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>स्वारगेट, हडपसर भागातील जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा, आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामूळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला त्यातून शरद पवार यांना संस्थेने केलेली विनंती पवार यांनी मान्य केली. शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, चिपळूण आणि सासवड येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. तर, १९९० मध्ये त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते मात्र, त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रीत असते त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल, असा विश्वास नहार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>Burger King Row : मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ नाव वापरण्यापासून रोखले, नेमकं काय आहे प्रकरण?

उद्घाटक कोण हे गुलदस्त्यामध्ये

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये १९५४ साली झालेल्या संमलनाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन केंद्रीयमंत्री काकासाहेब गाडगीळ होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता ७० वर्षांनी दिल्ली येथे होत असलेल्या संमेलनाचे उद्घाटक कोण असावे यादृष्टीने संपर्क सुरू आहेत. मात्र, सध्या कतरी संमेलनाचे उद्घाटक कोण हे गुलदस्त्यामध्ये आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar elected guest president of 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan held in delhi pune print news vvk 10 amy