लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘लाडकी बहीण, लाडकी लेक अशा योजना राबवून पैसे द्यायचे. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करायच्या नाहीत, असा कारभार राज्य सरकारचा आहे. महिला, मुलींवर दररोज अत्याचाराच्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष योजनांचा पैसा देण्यामध्ये अडकले आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. ‘येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून द्या,’ असे आवाहन पवार यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शुक्रवारी महानिर्धार मेळावा झाला. खराडी येथे झालेल्या या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. आमदार रोहित पवार, अशोक पवार, माजी खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के यांच्यासह इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी या भागातील सात ते आठ माजी नगरसेवकांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

आणखी वाचा-लोकजागर : पुण्यात ‘खड्ड्यांची सत्ता’

‘लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ४०० पारचा नारा देऊन देशाचे संविधान बदलण्याचा निर्धार करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली. देशाच्या संविधानाला मानणारे अनेक छोटे-मोठे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाले. मतदारांनाही संविधान बदलण्याचा निर्णय मंजूर नसल्याने नागरिकांची साथ मिळाली आणि राज्यात ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या राज्यकर्त्यांनीदेखील गेल्या पाच वर्षांत विकासाची कामे केलेली नाहीत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून द्या,’ असे आवाहन शरद पवार यांनी केले.

‘महिलांना लेक लाडकी, लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे दिले जातात. मात्र, राज्यातील महिलांवर, मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेत राज्य सरकार अपयशी ठरले आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

आणखी वाचा-चांदीवाल आयोग सार्वजनिक न केल्यास सरकारला न्यायालयात खेचणार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

‘त्यांनी तुमच्यासाठी काय केले?’

पवार म्हणाले, ‘सत्तेचा वापर राज्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी करायचा असतो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवड भागात त्यांनी अनेक मोठ्या कंपन्या आणल्या. त्यामुळे अनेकांना या परिसरात रोजगाराची संधी मिळाली. त्या भागाचा विकास झाला. राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करताना मी हिंजवडी भागात आयटी पार्क आणले. रांजणगाव, चाकण येथे एमआयडीसी तयार केली. खराडीमध्ये आयटी हब सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या भागाचा सर्वांगाने विकास झाला. खराडीमध्ये बाजूच्या शिरूर, पारनेरमधील ३० ते ४० हजार लोक येथे राहतात. त्यांना येथे रोजगाराची संधी मिळाली. गेल्या निवडणुकीत ज्यांच्या हातात तुम्ही सत्ता दिलीत, त्यांनी तुमच्यासाठी काय केले,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘कोयता गँग’ अशी पुण्याची ओळख

विद्येचे माहेरघर, सुरक्षित शहर अशी पुणे शहराची ओळख होती. मात्र, राज्यकर्त्यांचा वचक नसल्याने कोयता गँग, गुन्हेगारांचे शहर अशी पुण्याची नवीन ओळख बनल्याची टीका शरद पवार यांनी केली. शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली असून, दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या, हल्ले असे प्रकार सर्रास घडत आहेत. राज्यकर्ते गप्प बसल्याची टीका पवार यांनी केली.

आणखी वाचा-साखर उत्पादनात दहा लाख टनांनी घट शक्य होणार ? जाणून घ्या, कारणे आणि राज्यातील संभाव्य साखर उत्पादन

‘हाच का तो दमदार आमदार?’

वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचे फलक या भागात लावण्यात आले आहेत. यावरूनदेखील पवार यांनी आमदार टिंगरे यांचा समाचार घेतला. फलकांवर लिहिलेल्या ‘दमदार आमदार’ या मजकुराचा उल्लेख करून, ‘तुझा काय बंदोबस्त करायचा त्याचा निर्णय मतदार घेतील’ अशा शब्दांत पवारांनी टिंगरे यांना सुनावले. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताचा दाखला पवार यांनी दिला. ‘ज्या तरुण-तरुणीला या भरधाव कारने धडक दिली, त्यांना बघण्यासाठी रुग्णालयात न जाता आरोपीला वाचविण्यासाठी हा दिवट्या आमदार पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होता. तेथे जाऊन पोलिसांवर दबाव टाकणारा हा आमदार ‘दमदार’ का,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.